हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राजकारणातून वेळ काढून आपल्या गावी दोन दिवसीय सुट्टीवर आले आहेत. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या मूळ गावी शेतातील पिकांची पाहणी करत स्वतः मशागतीची कामे केली. तसेच स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या शेतात चंदनाच्या झाडांसह बांबू, स्ट्रॉबेरी आणि हळदीची लागवड केली आहे. सुट्टीवर आल्यानंतर त्यांनी शेतात चाकाच्या कुदळाच्या साहाय्याने आपल्या हळद पिकाची कोळपणी केली.
सातारा येथे आपल्या गावी आलो की माझे पाय आपोआप शेताकडे वळतात. शेती-मातीशी माझी नाळ जोडली गेली आहे. शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मी गावी आलो की आवडीने शेतात काम करतो. शेतात काम केल्याने एक वेगळाच आनंद मिळतो, असे एकनाथ शिंदे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले. मुलगा श्रीकांत याने शेतीत मोठे कष्ट घेतले असून, शेतीतील सुधारणांवर त्याचा भर असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
शेतात बांबू लागवड
केंद्र आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून बांबू शेतीस प्रोत्साहन दिले जात आहे. बांबू लागवडीचे फायदे लक्षात घेऊन शिंदे यांनीही आपल्या शेतात 20 हजार बांबू रोपांची लागवड केली आहे. याशिवाय राज्याचा कारभार चालवताना शिंदे यांनी राज्यात बांबू लागवडीसाठी मोठा प्रकल्प हाती घेतला असून, मनरेगा योजनेअंतर्गत सातारा, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांचा यात समावेश केला आहे. त्यासाठी शिंदे सरकारकडून शेतकऱ्यांना हेक्टरी 7 लाख रुपयांचे अनुदान मिळत आहे.