हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस उत्पादक (Ethanol Production) शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. डिसेंबर महिन्याच्या मध्यावधीपासून केंद्र सरकारने उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास निर्बंध घातले आहे. मात्र, आता लवकरच इथेनॉल निर्मितीसाठी 8 लाख टन अतिरिक्त साखर वापरण्यास परवानगी दिली जाणार आहे. यंदा अनुमानित अंदाजापेक्षा अधिक साखर उत्पादन मिळण्याची परिस्थिती हंगामाच्या शेवटी तयार झाली आहे. परिणामी, ही अतिरिक्त साखर इथेनॉल निर्मितीकडे (Ethanol Production) वळण्याचा सरकारचा विचार असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ज्यामुळे आता साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळणार असून, शेतकऱ्यांना बाकी असलेली थकबाकी देण्यास, त्यांना या निर्णयामुळे मदत होणार आहे.
राज्यासह देशात उत्पादन वाढले (Ethanol Production Allowed Soon)
सध्याच्या घडीला राज्यासह देशातील ऊस गाळप (Ethanol Production) अंतिम टप्प्यात आहे. इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (इस्मा) आकडेवारीनुसार, देशात सध्या 31 मार्च 2024 अखेरपर्यंत एकूण ३०२ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. अर्थात यावर्षीच्या निर्धारित अनुमानापेक्षा हे साखर उत्पादन अधिक आहे. तर साखर उत्पादन आघाडीवरील राज्य असलेल्या महाराष्ट्रात देखील यावर्षी 108 लाख टन साखरेचे उत्पादन नोंदवले गेले आहे. जे मागील वर्षीच्या हंगामातील एकूण साखर उत्पादनापेक्षा तीन लाख टन अधिक आहे. अर्थात निर्धारित लक्ष्यापेक्षा अधिकच्या उत्पादनाकडे साखर उत्पादनाची वाटचाल सुरु आहे.
पुढील पंधरवड्यात निर्णयावर शिक्कामोर्तब?
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उसापासून इथेनॉल निर्मिती (Ethanol Production) करण्यास परवानगी देण्याची मागणी केली जात आहे. त्यातच आता साखर उत्पादन वाढीची परिस्थिती पाहता, पुढील पंधरवड्यात एकूण साखर उत्पादनाच्या आढावा लक्षात घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, प्रत्यक्षात अधिक उत्पादन मिळत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वी केंद्र सरकारने आतापर्यंत चालू हंगामात एकूण 17 लाख टन साखर इथेनॉलसाठी वळविण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता आणखी 8 लाख टन अतिरिक्त साखर इथेनॉल निर्मितीसाठी वापरली जाऊ शकते. ज्यामुळे इथेनॉल उद्योगाला मोठा दिलासा मिळणार आहे.