प्रयोगशील शेतक-यांना उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देण्यासाठी पिकस्पर्धेचे आयोजन; जाणून घ्या या स्पर्धेबद्दल अधिक माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने खरीप हंगाम 2023 मध्ये सर्वसाधारण व आदीवासी गटासाठी खरीप ज्वारी, तुर, मुग, उडीद, सोयाबीन या पिकांसाठी पिकस्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

पीक स्पर्धेतील पीके –

खरीप पीके- ख. ज्वारी, तुर, मुग, उडीद व सोयाबीन (एकूण 05 पिके) पीक स्पर्धेतील पिकाची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान 1 हजार हेक्टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र 1 हजार हेक्टर पेक्षा कमी असल्यास व स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची विहीत मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. स्पर्धक संख्या, पीकस्पर्धा क्षेत्र, कापणी प्रयोग घ्यावयाची संख्या- पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे स्वतःच्या शेतावर त्यापीकाखाली 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क –

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) रक्कम रु.300 राहील. तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान 10 व आदिवासी गटासाठी किमान 05 यापेक्षा प्रवेश अर्ज कमी असल्यास, पिकस्पर्धा रद्द करण्यात येऊन प्रवेश शुल्क परत देण्यांत येईल.

अर्ज दाखल करण्याची तारीख –

खरीप हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहिल. मुग व उडीद या पिकांसाठी 31 जुलै तर ख. ज्वारी, तुर, सोयाबीन पिकांसाठी 31 ऑगस्ट, अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहित धरण्यात यावी. तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

बक्षिस स्वरुप –

सर्वसाधारण व अदिवासी तालुका पातळी गट बक्षिस रुपये पहिले रु. 5 हजार, दुसरे रु. 3 हजार व तिसरे रु. 2 हजार. जिल्हा पातळी पहिले रु. 10 हजार, दुसरे रु. 7 हजार व तिसरे रु. 5 हजार. राज्य पातळी पहिले रु. 50 हजार, दुसरे रु. 40 हजार व तिसरे रु. 30 हजार.

खरीप हंगाम दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेऊन पिकस्पर्धेत जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी व्हावे यासाठी शेतक-यांनी त्यांच्या अधिनस्त कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व्हि.डी. लोखंडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!