Soyabean : ऑगस्ट महिना चालू झाल्यापासून पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके सुकू लागली आहेत. पिकांची वाढ देखील पाण्याआभावी खुंटली आहे. राज्याच्या अनेक भागात पुरेसा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांची पिके धोक्यात आहेत. परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अडीच एकर सोयाबीन पिकातून रोटर फिरवल्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पावसाअभावी वाळत चाललेली पिके पाहून बळीराजा चिंतेत पडला आहे.
पिकाची वाढ खुंटल्याने फिरवला रोटर
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे पावसाअभावी सोयाबीन पीक वाढत नसल्याने शेतकऱ्याने (Farmer news) एक हेक्टर पिकावर रोटर फिरवला आहे. त्याचबरोबर जर येत्या आठवड्याभरत मुसळधार पाऊस झाला नाही तर पिकांची अतिशय गंभीर अवस्था होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अनेकजण पावसाची वाट पाहत आहेत.
आता रब्बीसाठी तयारी सुरु
पाऊस पडत नसल्याने परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील कल्याण सवणे या शेतकऱ्याने गट क्रं ३७० मधील १ हेक्टर १४ गुंठे क्षेत्रावर उशिरा पेरलेल्या व फुल अवस्थेतील सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवला आहे. आता खरिपाचे काही खरे नसुन रब्बी हंगामासाठी शेत तयार करून ठेवले असल्याचे सदरील शेतकऱ्याने सांगितले.
काही भागात पावसाची हजेरी
वर्धा जिल्ह्यामध्ये जवळपास पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने आगमन केले आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी पाऊस झाल्यामुळे पिकांना संजीवनी तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची पिके सुकून चालली होती मात्र थोड्याफार पावसाने पिकांना ओलावा निर्माण झाला आहे.
वाघाळ्यात शेतकऱ्यांने अडीच एकर क्षेत्रावर घातले रोटर !
पाऊस पडत नसल्याने वाघाळा येथील कल्याण सवणे या शेतकऱ्याने गट क्रं ३७० मधील १ हेक्टर १४ गुंठे क्षेत्रावर उशिरा पेरलेल्या व फुल अवस्थेतील सोयाबीन पिकावर
रोटावेटर घातला आहे . pic.twitter.com/tQz2Aj01h5— Hello Krushi (@HelloKrushi) August 18, 2023
पावसाचं पुन्हा कमबॅक
जवळपास पाऊसाने १५ दिवस विश्रांती घेतली होती. त्यांनतर मागच्या दोन दिवसापासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून राज्याच्या अनेक ठिकाणी पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. पुढील काळात मुसळधार पाऊस होऊन नदी नाले दुथडी भरून वाव्हेत अशी अशा शेतकऱ्यांना लागली आहे.
टोमॅटो उत्पादक शेतकरीही अडचणीत
येवला तालुक्यातील वडगाव येथील भाऊसाहेब कापसे या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रामध्ये टोमॅटोचे उत्पादन घेतले होते. मात्र आता या टोमॅटो पिकावर प्लास्टिक व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या रोगामुळे टोमॅटो झाडावरच पिवळे पडून काळे देखील पडत असल्याने त्यामुळे टोमॅटोची देखील गळती होत आहे.