Farmers Producer Organization : शेतकरी समृद्ध व्हावा, शेतमालाला विदेशात भाव मिळावा – सत्तार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था (Farmers Producer Organization) अधिक बळकट, सक्षम व्हाव्यात. याकरीता या संस्थांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार दिली आहे. बालेवाडी येथे आशियाई विकास बँक योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी उत्पादक संस्थांसाठी (Farmers Producer Organization) आयोजित तंत्रज्ञान कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

राज्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे, शेतमालाला देश-विदेशात योग्य भाव मिळाला पाहिजे. नाशवंत मालाची मंदीच्या काळात साठवणूक करता यावी. शेतीमालाची आयात-निर्यात सुलभरित्या करता यावी. यासाठी शेतकरी हिताचे कायदे तयार करण्यात येत आहेत. विद्यमान नियमात काळानुरूप बदलही करण्यात येत आहेत. असेही त्यांनी म्हटले आहे.

फलोत्पादनासाठी मॅग्नेट प्रकल्प (Farmers Producer Organization)

फलोत्पादन क्षेत्रातील कृषी व्यवसायाला चालना देण्याकरीता १ हजार १०० कोटी रुपयांचा महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, क्षमता विकास करणे, फलोत्पादन व फुल पिकांची गुणवत्ता तसेच उत्पादन वाढ करणे व साठवणूक करणे तसेच प्रक्रियेसाठी पायाभूत सुविधा उभारणी करणे, या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना ६० टक्क्यापर्यंत अनुदान देण्यात येत आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी होऊन या प्रकल्पाचा लाभ घ्यावा, असेही आवाहनही सत्तार यांनी केले आहे.

अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी (Farmers Producer Organization) उभी करताना बिगर शेती, बांधकाम, वीज आदीबाबत अडचणी आल्यास मॅग्नेट प्रकल्पाच्या संचालक मंडळाशी चर्चा करावी. संचालक मंडळ आणि बँकेने समन्वय साधून, शेतकऱ्यांच्या अडचणीच्या अनुषंगाने सकारात्मक मार्ग काढून अधिकाधिक शेतकरी या प्रकल्पात सहभागी होईल, यादृष्टीने प्रयत्न करावे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एखादी नवीन योजना आणता येईल, याबाबत विचार करावा. याकरीता सरकारकडून निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीही सत्तार यांनी दिली आहे.

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची गरज

फलोत्पादन पिकांची स्थानिक बाजारपेठ, प्रक्रीया व निर्यातीसाठी असलेली संधी पाहता वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था व मूल्यसाखळी गुंतवणूकदार यांना फलोत्पादन पिकांच्या सुधारित जाती, काढणीपश्चात व्यवस्थापन, पायाभूत सुविधांची उभारणी व बाजारपेठेबाबत माहिती आदीबाबत अद्ययावत माहिती व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान अवगत असणे ही काळाची गरज आहे. यादृष्टीने विविध प्रशिक्षण आयोजित करून त्यांना मार्गदर्शन करावे. शेतकरी उत्पादक संस्थांची निवड करुन विदेशात त्यांचे अभ्यास दौरे आयोजित करावेत, असेही सत्तार म्हणाले आहे. राज्यात विभागनिहाय अशा कार्यशाळा आयोजित कराव्यात, या माध्यमातून मॅग्नेट प्रकल्पाविषयी अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यत माहिती पोहचवावी. यामुळे आगामी काळात कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येईल, असेही ते म्हणाले आहे.

error: Content is protected !!