हॅलो कृषी । देशभरात बहुतांशी ठिकाणी सध्या जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या औषधी वनस्पतींची लागवड सध्याच्या शेतीमध्ये केली जात आहे. यात सर्वात अधिक चर्चा होत आहे ती अश्वगंधाची. लोकांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यात अश्वगंधा महत्वाची भूमिका निभावताना दिसतो आहे. भविष्यात बाजारांमध्ये अश्वगंधेला चांगली मागणी असणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळाची पाऊले ओळखून या पिकाची शेती करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी करार तत्वावरती शेती करावी किंवा गट शेती करावी. बऱ्याच वेळा बाजारपेठ मिळत नसल्याने शेतीत केलेला प्रयोग फसत असतो. त्यामुळे याची विक्री थेट मध्यप्रदेशमधील मुनिच किंवा मंदसौर बाजारामध्ये करावी. तेथे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.
या पिकासाठी लागवड खर्च कमी आहे. तसेच, पिकाची काळजी कमी घ्यावी लागते. त्यामुळे, कमी कालावधी मध्ये पारंपारिक पिकांना एक चांगला पर्याय अश्वगंधा पिकाची लागवड करून देऊन शकतो. जमीन आणि हवामान- या पीकाच्या लागवडीसाठी सर्व प्रकारची माती चालते, पण वाळूमिश्रीत पोयट्याची, लाल किंवा गाळाची जमीन चांगली असते. पाण्याचा निचरा होणारी, सेंद्रिय घटकांचे प्रमाण चांगले व २०-३० सेंमी भुसभुशीत जमीन असावी. मातीचा सामू साधारणता ७.५-८ पर्यंत असावा. लागवडीचे क्षेत्र निवडताना शक्यतो जमीन भुसभुशीत असावी, उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करून, २०-२५ टन चांगले कुजलेले शेणखत घालून घ्यावे. रोटावेटरने किंवा डिस्क हॅरोने ढेकळ फोडून घ्यावीत. वळीव पावसानंतर कुळवणी करून जमीन लागवडीसाठी तयार करून घ्यावी.
साधारण १५:२५ किलो नत्र:स्पुरद प्रती हेक्टरी द्यावे. लागवडीच्या सुरुवातीला आर्धी खताची मात्रा दयावी व राहिलेली मात्रा पिकाच्या वाढीच्या गरजेनुसार द्यावी. औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी शक्यतो सेंद्रिय खतांचा वापर करावा, त्यामध्ये शेण व गोमुत्राची स्लरी, वर्मिवॅशचा वापर उत्तम करावा. यामुळे पीक चांगल्या प्रकारे येईल व बाजारात त्याला चांगली मागणी मिळून त्यातून उत्पन्नही चांगले मिळेल.