Fertilizer Management : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डीएपी आणि युरियाच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. केंद्रीय खत सचिवांनी शेतकरी आणि राज्यांना त्यांचा समतोल वापर करण्यास सांगितले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात डीएपी आणि युरियाचा वाढता वापर पाहता केंद्रीय खत सचिव रजत कुमार मिश्रा यांनी शेतकरी आणि राज्यांना संतुलित वापरासाठी सांगितले आहे. या खरीप पिकाच्या हंगामात युरिया आणि डीएपीचा जास्त वापर दिसून आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत १३ लाख टन युरिया आणि १० लाख टन डीएपीची वाढ झाली आहे.
एका पत्रकार परिषदेदरम्यान केंद्रीय खत सचिव रजत कुमार मिश्रा म्हणाले की, चालू खरीप हंगामात १.८ कोटी टन खतांचा विक्रमी वापर झाला आहे. युरियाच्या वापरात १३ लाख टनांहून अधिक वाढ झाली आहे. रब्बी मोहिमेअंतर्गत आयोजित एका परिषदेत बोलताना ते म्हणाले की, जर १०,००० कोटी रुपयांचा आधुनिक आणि अत्यंत कार्यक्षम युरिया प्लांट उभारला तर एका वर्षात १०.५ लाख टन उत्पादन करता येऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी आम्हाला नवीन प्लांट उभारावा लागणार आहे, ते यावेळी म्हणाले.
खत वितरणावर बारकाईने लक्ष
गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत डीएपीचा वापर १० लाख टन अधिक होणार असल्याचे केंद्रीय खत सचिवांनी सांगितले. ते म्हणाले की, पाण्यानंतर उत्पादनावर परिणाम करणाऱ्या नऊ पीक निविष्ठांपैकी खत हे एक आहे. कृषी क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार खते देण्यासाठी केंद्र कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. रजत कुमार मिश्रा म्हणाले की केंद्राने २०२२-२३ मध्ये २.५ लाख कोटी रुपयांच्या अनुदानाचा बोजा उचलला आहे. खतांच्या वितरणावर काटेकोरपणे नजर ठेवण्यास आणि प्रादेशिक विषमता दूर करण्यासही त्यांनी राज्यांना सांगितले.