हॅलो कृषी ऑनलाईन : आशियाई विकास बँकेने (एडीबी) देशातील फलोत्पादन (Horticulture) घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 98 दशलक्ष डॉलरच्या कर्जास मंजुरी दिली आहे. भारतीय रुपयात ज्याचे मूल्य 816 कोटी 87 लाख 9 हजार रुपये इतके आहे. शेतकऱ्यांना (Horticulture) रोगमुक्त फळ पीक घेण्यासाठी लागणाऱ्या साधनांची खरेदी करता यावी, या उद्देशाने या कर्जास मंजुरी देण्यात आली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण फळांचे उत्पादन घेण्यासह प्रतिकूल हवामानास तोंड देण्यास मोठी मदत होणार आहे.
“उच्च मूल्य आणि पौष्टिक महत्त्वामुळे भारतीय शेतकऱ्यांचे (Horticulture) उत्पन्न वाढविण्यासाठी फलोत्पादनाचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे जागतिक फलोत्पादन क्षेत्रात भारताची कामगीरी पाहता, येथील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी पिकांचे आरोग्य सुधारण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना आधुनिक सामग्री उपलब्ध करून दिल्यास पिकांच्या कीड नियंत्रण करण्यास मदत होणार आहे. असे आशियाई विकास बँकेचे नैसर्गिक संसाधने विभागाचे कृषी तज्ज्ञ सुनाए किम यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे.
महाराष्ट्रात एक केंद्र (Horticulture loan from Asian Development Bank)
आशियाई विकास बँकेच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून देशात सहा केंद्र उभारली जाणार आहेत. या केंद्रांमध्ये अत्याधुनिक कीड नियंत्रण चाचणी पद्धतींसह सुसज्ज असलेल्या प्रयोगशाळा, प्रशिक्षित तज्ञ आणि कर्मचारी असतील. हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या मदतीने केंद्रीय कृषी मंत्रालय, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ आणि भारतीय कृषी संशोधन परिषद यांच्यामार्फत राबविला जाणार आहे. या प्रकल्पातील केंद्रांसाठी जागेचा शोध सुरु असून, या सहा पैकी एक केंद्र महाराष्ट्रात असणार आहे.
शेतकऱ्यांना फायदा होणार
त्यामुळे आता या प्रकल्पाच्या माध्यमातून आशियाई विकास बँकेने कर्ज मंजूर केल्याने देशासह राज्यातील फळ पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना केळी, संत्री, मोसंबी, पेरू, डाळींब, भेंडी, मिरची, स्ट्रॉबेरी या पिकांसाठी अत्याधुनिक साहित्य सामुग्री उपलब्ध होऊ शकणार आहे. ज्यात चांगल्या दर्जाची फळ पिकांची कलमे, रोपे यासह अन्य गोष्टी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.