हॅलो कृषी ऑनलाईन: कोल्हापूर जिल्ह्यातील 14 हजार 800 शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान (Incentive Grant For Farmers) जमा होणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवार, 26 फेब्रुवारीला याबाबतची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे अनुदान (Incentive Grant For Farmers) वितरण थांबले होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांना अनुदान मिळेल याची खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सह्यांनी आदेश जारी केले आहेत.
अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 40 कोटी रुपये कोल्हापूर महापालिकेला वर्ग केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2022 मध्ये 45 कोटी रुपयांची घोषणा केली होती. यातील 5 कोटी रुपये मंजूर झाले होते, तर 40 कोटी रुपयांचा निधी रखडला होता.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मागण्या मान्य (Incentive Grant For Farmers)
अलीकडेच कोल्हापूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी अनुदान आणि अंबाबाई मंदिर विकास आराखड्याबाबत चर्चा केली होती. या दोन्ही मागण्या अधिवेशनापूर्वी पूर्ण करू, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. त्यानुसार, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच या मागण्या मान्य केल्या गेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत आणि शासन शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत राहील, असे आश्वासन दिले आहे.