हॅलो कृषी ऑनलाईन । शेतीसाठी वरदान ठरलेल्या मुळा धरणातील पाणीसाठ्याबाबत (Mula Dam Water Storage) मोठी अपडेट समोर येत आहे. मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याचे पहायला मिळत आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या या मुळा धरणात सध्या फक्त १० हजार २०३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच ३९.२४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याच दिसतंय. हा पाणीसाठा १५ जुलै २०२५ पर्यंत पुरेल असं बोललं जातंय. सध्या शेतीसाठी उन्हाळी डाव्या व उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू आहे.यासाठी उजवा कालवा ३ हजार ५०० दशलक्ष घनफूट, तर डावा ४०० दशलक्ष घनफूट पाणी खर्च होणार आहे.
किती आहे पाणीसाठा – Mula Dam Water Storage
अहिल्यानगर- शहर आणि आसपासच्या औद्योगिक तसेच ग्रामीण भागाला मुळा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं असं धरण आहे. मुळा धरणात सध्या १०,०१८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे, ज्यापैकी ४,५०० दशलक्ष घनफूट मृतसाठा आहे. उर्वरित ५,५१८ दशलक्ष घनफूट पाणी वापरण्यायोग्य आहे. यंदा उन्हाळी सिंचनासाठी २७ एप्रिलपासून आतापर्यंत १,५०२ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. ५ जूनपर्यंत उजव्या कालव्यातून २,२०० दशलक्ष घनफूट आणि ३० मेपर्यंत डाव्या कालव्यातून ४५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे नियोजन आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे मुळा धरणात ५५ दशलक्ष घनमीटर इतका गाळ साठला आहे. गाळ काढला गेला तर अंदाजे दीड ते दोन दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा वाढू शकतो. गाळ उपसण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता (मुळा पाटबंधारे) सायली पाटील यांनी दिली आहे. १५ जुलैपर्यंत पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतीसाठी तसेच पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासणार नाही. परंतु , काही गावांमध्ये पाणीप्रश्न गंभीर बनला आहे, ज्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे असेही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मुळा धरणातील पाणीसाठा (Mula Dam Water Storage) अहमदनगरसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण मुळा धरण अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे 1 लाख हेक्टर जमिनीला सिंचन पुरवते. यामुळे डाळिंब, ऊस, कांदा, द्राक्षे यांसारखी पिके घेतली जातात. अहमदनगर शहर आणि आसपासच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मुळा धरणातून होतो. अशावेळी पाणीसाठा कमी झाल्यास सदर परिसरात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. अहिल्यानगर जिल्ह्यातील लघु आणि मध्यम उद्योगांना सुद्धा मुळा धरणातूनच पाणी पुरवलं जातंय.