हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात नुकतीच राज्यभर कांदा साठवणुकीसाठी कांदा महाबँक (Onion Maha Bank) उभारली जाणार असल्याची घोषणा केली आहे. आता कांदा साठवणुकीसाठी ही बँक उभारली जाणार म्हणजे नेमके काय होणार (Onion Maha Bank) आहे. यासाठी राज्य सरकारकडून नेमके काय केले जाणार आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
तुम्ही मुख्यमंत्र्यांची कांदा भंडारण बँक (Onion Maha Bank) उभारली जाणार अशी घोषणा ऐकल्यानंतर नक्कीच गोंधळात पडला असाल. मात्र कांदा भंडारण बँक म्हणजे विकिरण तंत्रज्ञानाच्या मदतीने कांदा साठवून ठेवणे. ज्यामुळे कांद्याचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना होणारे नुकसान टाळता येणार आहे. शेतकऱ्यांना या भंडारण बँकेच्या माध्यमातून कांदा साठवणुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या साठवणूक बँकेत विकिरण तंत्रज्ञानाच्या मदतीने कांद्याचे सूक्ष्मजीवांपासून होणारे नुकसान टाळले जाणार असून, कांदा जास्त कालावधीपर्यंत साठवून ठेवता येणार आहे.
वर्षभर कांदा उपलब्ध होणार (Onion Maha Bank In Maharashtra)
कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासह शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, या उद्देशाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. आयनीकरण विकिरण तंत्रज्ञानामध्ये अणूंची संरचना बदलल्यानंतर काही ऊर्जा तयार होत असते. याच विकिरण तंत्रज्ञानाच्या मदतीने कांद्यातील काही घटक मृत करत, त्याची जास्त काळ टिकण्यासाठी लाईफ वाढवली जाणार आहे. ज्यामुळे कांदा सडणे किंवा पिकणे यापासून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळले जाणार आहे. वर्षभर ताजा कांदा उपलब्ध होऊन दर स्थिर राहण्यासाठी यामुळे मदत होणार आहे.
अणू शास्त्रज्ञ काकोडकर यांचे मार्गदर्शन
अणू शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यासाठी राज्य सरकारला मार्गदर्शन करणार आहे. राज्यात कांदा साठवणुकीसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. मात्र आता अणू तंत्रज्ञानावर आधारित या कांदा भंडारण बँकेमुळे हे नुकसान न होण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारच्या या योजनेमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार असून, निश्चित दर मिळण्यास मदत होणार आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत म्हटले होते.
विकिरण तंत्रज्ञान पूर्णतः सुरक्षित
राज्यातील अनेक शेतकरी आपला कांदा पारंपरिक पद्धतीने चाळींमध्ये साठवतात. मात्र याद्वारे शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणात सडतो. मात्र आता या विकिरण तंत्रज्ञानाच्या मदतीने कांद्याला विकिरणांच्या संपर्कात आणले जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण काळजीपूर्वक पद्धतीने केली जाणार आहे. तसेच या प्रक्रियेत कांद्याला गरम केले जात नाही. रेडिओऍक्टिव्ह किरणांच्या मदतीने त्यातील सूक्ष्मजीव मारले जातात. हा विकिरणांचा मारा केलेला कांदा आहारात उपयोग करण्यासाठी पूर्णतः सुरक्षित असतो.