Parbhani News : परभणी जिल्ह्यातील साखर कारखाने उसाची रिकव्हरी कमी दाखवून उसाचे भाव पाडत शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोप साखर आयुक्तांना शेतकर्यांकडून देण्यात आलेल्या एका निवेदनात करण्यात आला आहे . शेतकरी कॉ .दीपक लिपणे , माधवराव निर्मळ यांनी पुण्यात साखर आयुक्त यांची भेट घेत जिल्ह्यातील साखर कारखानदार यांच्या संदर्भात तक्रारी व मागण्याचे २८ ऑगस्ट रोजी एक निवेदन दिले आहे.
परभणी जिल्ह्यातील साखर कारखानदार रिकव्हरी कमी दाखवून उसाचे भाव पाडत शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे म्हणत २०२१ -२२ मध्ये पाथरी तालुक्यातील योगेश्वरी शुगर ने रिकव्हरी कमी दाखवून शेतकऱ्यांना लुटण्याचे काम केल्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे म्हटले आहे .
यामुळे शेतकऱ्यांनी मागील वर्षी १७ऑगस्ट २०२२ रोजी सदरील साखर कारखान्यावर मोर्चा काढल्यानंतर साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर यांनी प्रति टन उसाला एफआरपी अधिक २०० रुपये देण्याचे मान्य करुन पंधरा दिवसात १०० रुपये व सन २०२२ -२३ हंगाम सुरू होण्यापूर्वी उर्वरित शंभर रुपये देण्याचे लेखी स्वरूपात दिले होते. यातील फक्त शंभर रुपये एवढा वाढीव दर त्यांनी दिला असून उर्वरित शंभर रुपये वाढीव दर दिलेला नसल्याने या कारखान्यावर साखर आयुक्तांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
मागण्या
२०२१ -२२ गळीत हंगामाचा रेवेन्यू शेअरिंग चार्ट व हिशोब प्रत द्यावी ,योगेश्वरी शुगरने ठरल्याप्रमाणे शंभर रुपये वाढीव दर ताबडतोब द्यावा ,परभणी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी सन २०२२ -२३ या गळीत हंगामातील ऊसाला किमान २ हजार ७०० रुपये भाव द्यावा व २३ -२४ गळीत हंगामाचा दर जाहीर करावा , २०२२ – २३ हंगामातील तोडणी व वाहतुकीचा बाब निहाय विवरण हिशोब द्यावा अशा मागण्या केल्या आहेत. मागण्या मान्य न करणाऱ्या जिल्हातील साखर कारखान्यांचे येत्या गळीत हंगामात धुराडे पेटू देणार नाही असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे .