हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) केंद्र सरकारने सुरु केली आहे. या योजनेचा 16 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. मात्र, त्यासाठी अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे. या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून 12 ते 19 फेब्रुवारी या कालावधीमध्ये ई-केवायसी शिबीरे राबवली जाणार आहेत. देशातील 19 राज्यांतील गावा-गावांमध्ये ही शिबिरे आयोजित केली जाणार आहे. अर्थात ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पीएम किसान योजनेची (PM Kisan Yojana) ई-केवायसी केली नसेल, त्यांना या शिबिरांमध्ये ती पूर्ण करता येणार आहे.
सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळावा (PM Kisan Yojana E-KYC)
देशातील शेतकरी पीएम किसान योजनेपासून (PM Kisan Yojana) वंचित राहू नये. यासाठी कृषी मंत्रालयाकडून ही शिबिरे राबवली जाणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, “12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2024 या दहा दिवसांच्या कालावधीत शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी गावा-गावांमध्ये शिबिरे आयोजित केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि बिहारसह देशातील 19 राज्यांमध्ये ही ई-केवायसी शिबिरे घेतली जाणार आहे.”
काय आहे पीएम किसान योजना?
देशातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी पीएम किसान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम दर चार महिन्यांनी 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना वितरित केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर 2023 रोजी पीएम किसानचा 15 वा हप्ता जारी केला होता. या 15 व्या हप्त्याचा 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे.
केंद्र सरकारने आतापर्यंत या योजनेअंतर्गत 15 हप्ते जारी केले असून, त्यासाठी आतापर्यंत एकूण 2.81 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच या योजनेचा आतापर्यत देशातील 11 कोटी शेतकऱ्यांनी फायदा घेतला आहे. चालू फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात योजनेचा 16 वा हप्ता दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्याबाबत सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.