हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर (Potato Rate) मिळत नाहीये. ज्यामुळे त्यांना उत्पादन खर्चही मिळणे मुश्किल झाले आहे. अशातच बटाटा उत्पादकांना अच्छे दिन आले असून, येत्या काही दिवसात बटाट्याचा भाव देशातील अनेक भागात 50 रुपयांच्या वर पोहोचण्याची शक्यता आहे. देशात बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन घेण्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पश्चिम बंगालमध्ये यंदा उत्पादन घटल्याने, यंदा बटाट्याच्या दरात वाढ होण्याची स्थिती उद्भवली आहे. दरम्यान, कर्नाटक राज्यातील खरीप हंगामातील हसन बटाटे ऑगस्टमध्ये बाजारात येतील. तोपर्यंत बटाट्याचे भाव (Potato Rate) चढेच राहतील. अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
80 टक्के शीतगृहे फुल (Potato Rate Increase In India)
सध्यस्थितीत उत्तर प्रदेशातील 80 टक्के शीतगृहे बटाट्याने भरली आहेत. सध्या दक्षिण भारतात बंगालऐवजी उत्तर प्रदेशातून बटाटा जात आहे. बटाटा हे केवळ भारतातच नव्हे तर जगात सर्वाधिक खाल्ले जाणारे भाजीपाला पीक आहे. बटाटा उत्पादनात चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर देशात सर्वाधिक 29 टक्के उत्पादन उत्तर प्रदेशात होते. त्याखालोखाल पश्चिम बंगाल सुमारे 23 टक्के, बिहार 17 टक्के, गुजरात 7 टक्के आणि मध्य प्रदेशात 6 टक्के बटाटा उत्पादन होते. याशिवाय महाराष्ट्रात देखील बऱ्याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बटाटा उत्पादन होते.
जुलै महिन्यापर्यंत दर चढेच
बटाटा दरात वाढ होण्यामागे प्रमुख उत्पादक राज्य असलेल्या पश्चिम बंगाल राज्याची भूमिका खूप महत्वाची आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, देशातील बटाटा उत्पादन हे यंदा 12 लाख टनांनी कमी आहे. ज्यामुळे जुलै महिन्यापर्यंत देशातील बटाटा दर (Potato Rate) हे तेजीतच राहतील. असे सांगितले जात आहे. बटाटा व्यापारातील एका व्यापाऱ्याने म्हटले आहे की, येणाऱ्या जुलै महिन्यापर्यंत देशातील बटाटा दरात तेजी राहण्याची शक्यता असून, या कालावधीत देशातील बटाटा दर हे 50 रुपये प्रति किलोपर्यंत वाढू शकतात. अर्थात जोपर्यंत कर्नाटकातील नवीन बटाटा बाजारात येत नाही. तोपर्यंत बटाटा दर हे तेजीतच राहतील, असेही त्यांनी म्हटले आहे.