हॅलो कृषी ऑनलाईन : ऑगस्टनंतर आता ऑक्टोबर महिनाही कोरडा गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. देशातील महत्वाच्या कृषी उत्पादक राज्यांमध्ये पावसाअभावी शेतात ओलच नसल्याने अनेक भागात रब्बीची पेरणी (Rabi Sowing) रखडली आहे. थंडीच्या दिवसात तापमान कमी राहत असल्याने पिकांना अधिकच्या पाण्याची आवश्यकता नसते. मात्र उगवणीसाठी ओलच नसल्याने अनेक भागात शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
कोणकोणत्या राज्यांमध्ये भीषण परिस्थिती ?
उपग्रहीय छायाचित्रावरून देशातील जवळपास 50 टक्के भागात पावसाचा अभाव असून, अनेक ठिकाणी शेतात भेगा पडल्याचे समोर आले आहे. अशा प्रदेशात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशचा प्रश्चिम भाग या महत्वाच्या कृषी उत्पादक राज्यांमध्ये पावसाची भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे या भागांत रब्बीची पेरणी (Rabi Sowing) प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे. या राज्यांमध्ये प्रामुख्याने गहू, हरभरा, मोहरी, मसूर, वाटाणा, मका, ज्वारी, जिरे, हळद आणि लाल मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
दरवर्षी या महिन्यात असते रब्बी लागवडीची लगभग- Rabi Sowing
सध्या काही भागात हळद आणि मिरचीची लागवड झाली आहे. मात्र अन्य पिकांची लागवड ही प्राथमिक अवस्थेत आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात रब्बीच्या लागवडीची मोठी लगभग असते. मात्र यावर्षी पावसाअभावी कोरडवाहू पेरणीवर मोठा प्रभाव दिसून येत आहे. दक्षिण- पश्चिम भारतात तर चांगला पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी नदी-नाले कोरडेठाक असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय धरणांच्या पाणीपातळीतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे या भागात रब्बीच्या पिकांना (Rabi Sowing) पाणीच उपलब्ध नाही.
एकूणच देशातील अनेक भागांमध्ये सद्यस्थितीत रब्बीच्या पेरणीस अनुकूल वातावरण नाहीये. अनेक भागांमध्ये मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. तर हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील जवळपास 60 एक जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यात पाऊसच झाला नाही. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये रब्बीची पेरणी पूर्णपणे प्रभावित झाली आहे.