हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोने,चांदी,अशा मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याच्या वार्ता तुम्ही ऐकल्या असतील मात्र पुणे जिल्ह्यात चक्क बैल चोरून नेल्याची घटना घडली आहे.
त्याचं झालं असं की, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मानाजीनगर येथील ही घटना आहे. येथील ऊसतोड मजूर झोपडीसमोर खिलार जातीचे खोंड बांधून ऊसतोडीला गेले होते. जेव्हा ते परत आले तेव्हा त्याना बैल निदर्शनास आला नाही. आजूबाजूला चौकशी करून देखील काही माहिती मिळाली नाही. त्यांनी बराच काळ खोंडाचा शोध घेतला. तरी देखील खोंड मिळून न आल्याने अखेर ऊस तोड मजूर रमेश रामा करगळ यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी एका दिवसात चोरट्यांना पकडून बैल ताब्यात घेतला.
पोलिसांनी केलेल्या चौकशीअंती गावात चाकण भागातील लोक खिल्लार खोंड खरेदीसाठी येऊन गेल्याची माहिती मिळाली. सखोल चौकशी करून पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर चोरी केलेला खोंड आधी विकत मागितला असल्याची माहिती पुढे आली.
याप्रकरणी संयोग संभाजी साबळे, प्रवीण शिवाजी घेनंद, रोहित शिवाजी यादव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास फौजदार गणेश कवितके पोलीस नाईक हिरालाल खोमणे दादासाहेब डोईफोडे गोपाळ जाधव यांनी केला.
बैलगाडा शर्यतीला परवानगी
नुकतेच राज्य सरकारने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच अटी आणि शर्ती सह बैलगाडा शर्यती देखील सुरू होतील. त्यामुळे सहाजिकच शर्यतीचे खोंड यांना बाजारात मागणी वाढणार आहेत. त्याला चांगली किंमतही मिळणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येत आहेत.