हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे (Red Chilli) तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि ओडिसा या राज्यांना मोठा फटका बसला आहे. यात प्रामुख्याने मुसळधार पावसासह 90 ते 100 किमी प्रति तास वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आंध्रप्रदेशातील लाल मिरचीच्या (Red Chilli) उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. आंध्रप्रदेशातील एकूण लाल मिरचीच्या उत्पादनापैकी जवळपास 20 टक्के मिरचीच्या पिकाचे नुकसान झाले आहे. असे राष्ट्रीय मिरची निर्यातदार संघटनेने म्हटले आहे.
आंध्रप्रदेश हे राज्य लाल मिरचीच्या उत्पादनासाठी देशातील आघाडीचे राज्य आहे. आंध्रप्रदेशातील गुंटूर, ओंगोले, कृष्णा आणि खम्माम या जिल्ह्यांमध्ये लाल मिरचीचे (Red Chilli) पीक पूर्ण पाण्याखाली गेले आहे. झालेल्या नुकसानीचा आकडेवारी समोर येऊ शकली नसली तरी या जिल्ह्यांमधील मिरचीच्या शेतांमध्ये पाणी तुंबले आहे. काळपट मातीमुळे मिरची कुजण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. कारण या ठिकाणी मुख्यतः काळ्या जमिनीत मिरचीची लागवड केली जाते. त्यामुळे मातीतील ओलावा कमी होण्यासाठी जास्त कालावधी जाऊ शकतो. यावर्षी उत्पादन ऐन महिनाभरावर तोडणीला आले असताना चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी मिरचीचे पीक पाण्याखाली गेले आहे. असेही राष्ट्रीय मिरची निर्यातदार संघटनेने म्हटले आहे.
प्रति किलोमागे 10 रुपये वाढ (Red Chilli Crop Damage In Andhra Pradesh)
आंध्रप्रदेशात जवळपास देशातील एकूण लाल मिरचीच्या लागवडीपैकी 70 टक्के लागवड केली जाते. तर त्या ठिकाणी जवळपास एकूण उत्पादनापैकी 75 टक्के मिरचीचे उत्पादन घेतले जाते. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र्र असून, नंदुरबार जिल्हा लाल मिरचीच्या उत्पादनासाठी देशात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव, आणि काही प्रमाणात विदर्भ मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. आंध्रप्रदेशात झालेल्या लाल मिरची पिकाच्या नुकसानीमुळे तेथील स्थानिक बाजारपेठांमध्ये लाल मिरचीच्या दरात प्रति किलोमागे दहा रुपयांची वाढ नोंदवली गेल्याचे सांगितले जात आहे.