हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या खरीप हंगामात (२०२३-२४) देशातील तांदूळ उत्पादनात ३.७९ टक्क्यांनी घट (Rice Production) होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाकडून याबाबत शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी पेक्षा यंदा पाऊस कमी पडला त्यामुळे तांदळाच्या उत्पादनावर त्याचा थेट परिणाम पहायला मिळाला. उत्पादन कमी झाल्यामुळे तांदळाच्या किमतीत मात्र वाढ होण्याची शक्यता आहे. अशावेळी महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकार नेमकं काय पाऊल उचलते आणि कोणते धोरणात्मक निर्णय राबवते हे आता पाहावं लागेल.
किती टन तांदूळ उत्पादन होईल? Rice Production
चालू हंगामात देशात १०६.३१ मिलियन टन इतका तांदूळ उत्पादित (Rice Production) होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी याच कालावधीत ११०.५ मिलियन टन इतका तांदूळ उत्पादित झाला होता. अल निनोच्या प्रभावामुळे देशातील प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांमध्ये मान्सून सरासरीपेक्षा कमी राहिला. त्यामुळे तांदूळ उप्तादनात घट होणार असल्याचे कृषी मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
याशिवाय यावर्षीच्या खरीप हंगामात मका उत्पादनातही घट होणार असून ते २२.४८ मिलियन टन इतके राहण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी याच कालावधीत २३.६ मिलियन टन इतके मका उत्पादन नोंदवले गेले होते. मात्र असे असले तरी यावर्षी तुरीच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा देशात ३.४२ मिलियन टन इतके तूर उत्पादन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत ३.३१ मिलियन टन इतके नोंदवले गेले होते.
याशिवाय यावर्षी मूग उत्पादन १.४० मिलियन टन इतके होण्याचा अंदाज आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत १.७१ मिलियन टन इतके नोंदवले गेले होते. यावर्षी तीळ उत्पादन हे २१.५३ मिलियन टन इतके होण्याचा अंदाज आहे. जे मागील याच कालावधीत २६.१५ मिलियन टन इतके नोंदवले गेले होते. यावर्षी भुईमुगाचे उत्पादन हे ७.८२ मिलियन टन इतके होण्याचा अंदाज आहे. तर सोयाबीन उत्पादन ११.५२ मिलियन टन इतके नोंदवले जाऊ शकते, अशी माहितीही कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.