हॅलो कृषी ऑनलाईन : द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र आघाडीचे राज्य असून, नाशिक आणि सांगली जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष पीक (Sangli Grapes) घेतले जाते. या दोन जिल्ह्यांमधून विदेशात मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात होते. चालू हंगामातील सांगली जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली असून, 30 कंटेनरच्या माध्यमातून आतापर्यंत 438 टन द्राक्ष निर्यात दुबई आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे दुबई आणि सौदी अरेबियातील नागरिकांना सांगलीच्या द्राक्षांची (Sangli Grapes) चव चाखायला मिळत आहे.
आतापर्यंत 5579 हेक्टरवर नोंदणी (Sangli Grapes Export To Dubai)
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, 2023-24 या चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामामध्ये (Sangli Grapes) राज्यातून 16 हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष निर्यात करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. ज्यामध्ये आतापर्यंत राज्यात 5579 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागांची निर्यातीसाठी नोंदणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातून द्राक्ष निर्यातीसाठी सर्वाधिक शेतकऱ्यांनी आपल्या बागांची नोंदणी कृषी विभागाकडे केली आहे. तासगाव (1366), मिरज (924), खानापूर (972), कडेगांव (5), आटपाडी (72) हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागांची नोंदणी आतापर्यंत होऊ शकली आहे. ज्यामध्ये येत्या पंधरवड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाकडून केली जात आहे.
सांगलीहून निर्यातीला वेग
महाराष्ट्र हे देशातील प्रमुख द्राक्ष निर्यातदार राज्य असून, देशातील एकूण द्राक्ष उत्पादनापैकी राज्यात जवळपास 90 टक्के उत्पादन होते. महाराष्ट्रातून प्रामुख्याने दुबई, सौदी अरेबिया आणि युरोपियन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष पाठवली जातात. सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यातून दुबई आणि सौदी अरेबियामध्ये द्राक्ष निर्यात सुरू आहे. मात्र असे असले तरी इस्राईल-पॅलेस्टाईन युद्धामुळे नाशिक जिल्ह्यातून युरोपियन देशांना होणारी द्राक्ष निर्यात पूर्णपणे थांबली आहे.
शेतकऱ्यांच्या मेहनतीला फळ
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांच्या मेहनतीला फळ आले असून, सांगली जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू होताच निर्यात देखील सुरू झाली आहे. जानेवारीच्या मध्यापर्यंत युरोपियन देशांमध्येही सांगलीहून द्राक्ष निर्यात सुरू होईल. तर जानेवारीच्या शेवटापर्यंत सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीला मोठा वेग येईल, असे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे.