कोल्हापूर : सध्या मिरचीचा बाजार हा अंतिम टप्प्यात आला आहे त्यामुळे बाजारपेठांमध्ये मिरचीची चणचण जाणवत आहे. मिरची उत्पादक प्रदेशात चार महिन्यांपूर्वी पाऊस झाल्याने मिरचीच्या अवक मध्ये घट झाली आहे. त्यामुळे यंदा संकेश्वरी मिरचीचे दर उच्चांकी आहेत. घाऊक बाजारात या मिरचीला क्विंटलला किमान 80 हजार ते कमाल दीड लाख रुपयांपर्यंत दर मिळत आहे. याशिवाय इतर जातीच्या मिरची मध्ये देखील 30 ते 40 रुपयांची वाढ झाली आहे.
संकेश्वरी मिरची पिकाची लागवड गडहिंग्लज व कर्नाटकातील संकेश्वर चिकोडी भागात केली जाते. यंदा पीक वाढीच्या अवस्थेत असतानाच सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान वादळी पाऊस झाला. यामुळे मिरचीचे व्यवस्थापन करणे अशक्य बनले. त्यामुळे शेतकऱ्यांना जेवढं अपेक्षित उत्पादन होतं तेवढं मिळालं नाही. याउलट मागणी मात्र जास्त असल्यामुळे बाजारपेठांमध्ये मिरचीचे दर चढेच राहिले आहेत. मागच्या वर्षी ही एक लाख 80 हजारांपर्यंत दर मिळाला होता यंदा दर चांगला मिळाला असला तरी उत्पादनात घट आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
सध्या पश्चिम महाराष्ट्रात जवारी बरोबरच बेडगी, गुंटूर, लवंगी मिरची ला ही मागणी असते. बेडगी चे उत्पादन रायचूर हुबळी भागात होते तर गुंटूर,लवंगी मिरची ची मध्य प्रदेश आंध्र प्रदेश मध्ये लागवड होते. सध्या आनेगिरी ब्याडगीस क्विंटलला 29 हजार रुपये ते 31 हजार रुपये, गुंटूर मिरचीला क्विंटलला 125000, लवंगी मिरची ला 17000 ते 18000 रुपये दर मिळत आहे.