हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावे, आपल्या पिकांना पाणी देता यावे, यासाठी केंद्र सरकारकडून ‘पंतप्रधान कुसुम सोलर योजना’ (Solar Pump) राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक ७१ हजार ९५८ सोलर पंप (Solar Pump) बसविण्यात आले आहे. असे राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना सोलर पंप बसविण्यासाठी एकत्रिपणे अनुदान दिले जाते.
‘पंतप्रधान कुसुम सोलर योजना’ केंद्र सरकारच्या नवीकरण ऊर्जा मंत्रालयाकडून २०१९ ते २०२३ या कालावधीसाठी राबवित जात आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व राज्यांना ९ लाख ४६ हजार ४७१ सोलर पंप बसविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी २ लाख ७२ हजार ९१६ सोलर पंप सध्या देशभरात बसविण्यात आले आहेत. यातील सर्वाधिक सोलर पंप बसविण्याचा मान महाराष्ट्राने पटकावला आहे.
हरियाणा दुसऱ्या स्थानी (Solar Pump)
महाराष्ट्रात २ लाख २५ हजार सोलर पंप बसविण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली होती. त्यापैकी सध्यस्थितीत राज्यात ७१ हजार ९५८ पंप बसविण्यात आले आहे. हरियाणामध्ये २ लाख ५२ हजार सोलर पंप बसविण्यास केंद्राची मंजुरी दिलेली असून, त्यापैकी ६४ हजार ९१९ पंप बसविण्यात आले आहे. राजस्थानात १ लाख ९८ हजार सोलर पंप बसविण्यास केंद्राने मंजुरी दिली असून, त्यापैकी ५९ हजार ७३२ पंप राजस्थान सरकारकडून बसविण्यात आले आहे. तर उत्तर प्रदेशात ६६ हजार ८४२ सोलर पंप बसविण्यास केंद्राने मजुरी दिली असून, त्या ठिकाणी ३१ हजार ७३२ सोलर पंप बसविण्यात आले आहेत.
८ लाख ७४ हजार ९७ अर्ज
पीएम कुसुम योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारकडून स्वतंत्र पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासापासून सोलर पंप स्थापित करेपर्यंत सर्व माहिती पुरवली जाते. या योजनेसाठी राज्यातील ८ लाख ७४ हजार ९७ शेतकऱ्यांनी आतापर्यंत पोर्टलवर अर्ज केले असून, त्यापैकी १ लाख ४ हजार ८२३ पंपांना मंजुरी देण्यात आली आहे. यात मंजुरी मिळालेल्या ७१ हजार ९५८ शेतकऱ्यांनी योजनेबाबतचे सर्व सोपस्कार पूर्ण केल्याने त्याचे सोलर पंप स्थापित झाले आहेत. असेही राज्य सरकारने आपल्या आकडेवारीत म्हटले आहे.