हॅलो कृषी । मार्च, एप्रिल आणि मे 2021 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीची माहिती राज्य सरकारने जिल्हाधिकारी यांच्याकडून मागवली आहे. सर्व तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठवून नुकसानीचा पीकनिहाय अहवाल मागवला आहे. राज्यातील जवळपास 46 हजार 700 शेतकऱ्यांना 55 ते 58 कोटींचा फटका बसल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. द्राक्ष पिकासह केळी, बेदाणा, आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्यभरातील नुकसानीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला असून त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील अंदाजित तीन ते साडेतीन हजार शेतकऱ्यांचे 11 कोटींचे तर उर्वरित जिल्ह्यांमधील 43 हजार शेतकऱ्यांचे 45 ते 46 कोटींचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्याला अवकाळीच्या संकटाला येन कोरोनाच्या संकटाशी दोन हात करतानाच सामोरे जावे लागले. मार्च-एप्रिल व मे महिन्यातील अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका पुणे, नाशिक, ठाणे विभागातील बहुतांश जिल्ह्यांसह अकोला, अमरावती, बुलडाणा येथील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांना बसला. त्यात सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळ व माळशिरस तालुक्यांचाही समावेश आहे. संबंधित तालुक्यांनी नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचना तहसीलदारांना जिल्हा प्रशासनाकडून आधीच देण्यात आल्या होत्या.
तहसीलदारांनी जिल्हा प्रशासनकडून सूचना मिळाल्यानंतर त्यावेळी पंचनामे करून ठेवले होते. सरकारने अवकाळीच्या नुकसानीची माहिती मागविल्याने ते अहवाल शासनाला सोमवारपर्यंत पाठविले जाणार आहेत. कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या बळिराजाला मदतीचा हात देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सध्या शेतकरी शासन दरबारी आस लावून बसल्याचे पाहायला मिळत आहे.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा