Success Story : दुष्काळातही गगन भरारी; शिमला मिरचीतून शेतकऱ्याची 65 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा पावसाचे प्रमाण असून, अनेक भागात दुष्काळी परिस्थितीचा (Success Story) सामना करावा लागत आहे. मात्र अशातही उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्यास भरघोस उत्पन्न मिळवता येते. सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे प्रगतिशील शेतकरी जालिंदर सोळसकर यांनी हे दाखवून दिले आहे. जालिंदर यांनी आपल्याकडील उपलब्ध पाण्यात ठिबक व्यवस्था करून, 2 एकरात शिमला मिरचीचे उत्पादन घेतले. यातून त्यांना आतापर्यंत 65 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही त्यांनी सुयोग्य नियोजनातून मिळवलेल्या शिमला मिरचीच्या उत्पन्नाची (Success Story) सध्या सर्वदूर चर्चा होत आहे.

पाणी नियोजनावर भर (Success Story Of Capsicum Farming)

पर्जन्यछायेचा प्रदेश असल्याने सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव या तालुक्यांची ओळख ‘दुष्काळी पट्टा’ म्हणूनच होते. मात्र, सध्या अनेक शेतकरी या भागात पाण्याचे योग्य नियोजन करून कमतरतेवर मात करत असून, भाजीपाला पिके घेत आहे. शेतकरी जालिंदर यांनीही आपल्याकडे असलेल्या पाण्याच्या नियोजनावर भर दिला. यासाठी त्यांनी आपल्या शिमला मिरचीच्या लागवडीसाठी मल्चिंग पेपरसह ठिबक व्यवस्था उभारली. ज्यामुळे त्यांना कमी पाण्यात शिमला मिरचीचे पीक घेणे शक्य झाले.

किती आला उत्पादन खर्च?

शेतकरी जालिंदर सोळसकर हे प्रगतिशील शेतकरी असून, ते आपल्या शेतात नियमित नवनवीन प्रयोग करत असतात. मागील काही वर्षांपासून त्यांनी टोमॅटो, दोडका या आणि अन्य भाजीपाला पिकांच्या लागवडीतून चांगला नफा मिळवला आहे. यावेळी त्यांनीं आपल्या शेतीमध्ये शिमला मिरचीची लागवड केली असून, त्यासाठी त्यांना 2 एकराला जवळपास 10 लाख रुपये इतका खर्च आला आहे.

किती मिळाले उत्पन्न?

पाच महिन्यांपूर्वी लागवड केलेल्या त्यांच्या शिमला मिरचीचे आतापर्यंत 13 खुडे झाले असून, त्यातून त्यांनी प्रति खुडा 13 टन मिरची याप्रमाणे उत्पादन घेतले आहे. असे एकूण आतापर्यंत त्यांनी 150 टनांहून अधिक शिमला मिरचीचे उत्पादन मिळवले आहे. या 150 टन मालापासून आतापर्यंतच्या मिळालेल्या शिमला मिरचीच्या दरानुसार त्यांना 75 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. यातून खर्च वजा जाता त्यांना 65 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. शिमला मिरचीचे उत्पादना घेताना भुरी आणि अन्य रोगांच्या नियंत्रणासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी वेळोवेळी फवारणी घ्यावी लागते. अन्यथा संपूर्ण प्लॉटला फटका बसण्याची शक्यता असते, असेही शेतकरी जालिंदर सोळसकर यांनी शेवटी म्हटले आहे.

error: Content is protected !!