हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये उत्पन्न नाही, शेती व्यवसाय (Success Story) हा बेभरवशाचा आहे. असे आपण नेहमीच ऐकत आलो आहे. दुष्काळ, अतिवृष्टी यांसारखी संकटे पाहता शेतीतून निघणाऱ्या उत्पनाचा भरवसा नसतो. मात्र, शेतीमध्ये कष्ट घेणाऱ्यांसाठी काहीही अवघड नसते. कारण एखाद्या पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान, लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन आदी गोष्टी समजावून घेतल्या तर आपण त्यातून भरपूर नफा कमावू शकतो. हेच अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील नांदूर येथील दोन शेतकरी बंधूंनी दाखवून दिले आहे. त्यांनी आपल्या शेतीमध्ये विक्रमी आले उत्पादन (Success Story) घेतले आहे.
शास्त्रशुद्ध पद्धतीने आले लागवड (Success Story Of Ginger Farming)
अमोल भदे आणि बाबासाहेब भदे असे या दोन्ही शेतकरी बंधूंचे नाव असून, ते अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने आले पिकाची लागवड करत आहे. आले लागवडीपूर्वी भदे बंधू शेतीची दोन वेळा नांगरणी, एक वेळा कल्टीव्हेटर करून रोटावेटर मारून जमिनीची चांगली मशागत करून घेतात. जमिनीच्या मशागतीच्या वेळेस एकरी चार ट्रॅक्टर कुजलेल्या शेणखताचा वापर केला जातो. त्यानंतर साडेचार फूट अंतरावर बेड पद्धतीने ठिबक सिंचनाचा वापर करून यावर लागवड करताना बीजप्रक्रिया करून लागवड केली जाते. लागवड करताना सेंद्रिय आणि रासायनिक खतांची योग्य मात्रा ही माती परीक्षणानुसार दिली जाते. असे ते सांगतात.
विक्रमी 30 टन उत्पादन
अमोल भदे आणि बाबासाहेब भदे सांगतात, यंदा आपल्याला आले पिकाचे विक्रमी एकरी 30 टन उत्पादन मिळाले आहे. विशेष म्हणजे शेणखताच्या वापरामुळे त्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे ते सांगतात. याशिवाय ठिबक पद्धतीमुळे आपल्या कमी पाण्यातया अधिक उत्पादन मिळवता आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. यातून त्यांना चांगला फायदा झाला आहे. असे दोघेही बंधू सांगतात.
सेंद्रिय खतांसह रासायनिक खतांचाही वापर
अमोल भदे सांगतात, कीटकनाशकाचा वापर करत असताना सेंद्रिय, वनस्पतीजन्य आणि एकात्मिक कीड नियंत्रणावरती आपण भर दिला. याशिवाय खत व्यवस्थापन करत असताना पिकाला काय गरज आहे, त्यानुसार खतांचा वापर करत असताना जिवाणू खते, विद्राव्य खते, त्याचबरोबर सेंद्रिय खते आणि गरजेनुसार रासायनिक खतांचा वापर देखील केला. पिकांचा कालावधी हा साडेआठ महिने असला तरी या पिकाच्या माध्यमातून उत्पादन देखील विक्रमी मिळत असते. असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.