हॅलो कृषी ऑनलाईन: चंद्रपूर जिल्ह्यातील एक महिला शेतकरी (Success Story) सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला लागवड करून महिन्याला लाखो रूपयांचे उत्पन्न घेत आहे. विशेष म्हणजे त्या त्यांच्या शेताच्या बांधावरच भाजीपाल्याची विक्री करुन दररोज किमान ५ हजार यानुसार महिन्याला दीड लाखांची उलाढाल (Success Story) करत आहेत.
या शेतकरी महिलेचे नाव आहे संगीता लक्ष्मीकांत उमाटे. सध्या नैसर्गिक संकटे, सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, वाढत्या महागाईमुळे शेतीचे वाढते उत्पादन खर्च, व शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे बहुतेक शेतकरी शेतीकडे पाठ फिरवतात. मात्र, या सर्व संकटांवर मात करून, शेतीत नवे प्रयोग केले तर शेती फायदेशीर ठरू शकते, हे सिद्ध करून दाखविले आहे ते संगीता उमाटे या शेतकरी महिलेने.
त्यांनी केवळ एका एकरात भाजीपाला लागवडीस सुरुवात केली. सेंद्रीय खतांचा वापर करून पिकवण्यात येणाऱ्या भाजीपाल्याला मोठी मागणी असते हे त्यांना माहित होते. विशेषतः नागपूर, पुणे येथील नागरिक चंद्रपुरात आले की हा भाजीपाला आवर्जून घेतात असे त्यांच्या लक्षात आले. व त्यांनी सुद्धा शेतात सेंद्रिय खताचा वापर सुरू केला.
त्यांच्या शेतात त्या वांगे, टमाटर, मिरची, कोथिंबीर,ज्वारी मेथी, पालक, फुलकोबी, हिरवी, लाल चवळी, कारले, शेंगा अशा अनेक भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. या भाजीपाला पिकात ते रासायनिक खताचा अजिबात वापर करीत नाहीत. त्यांच्या सेंद्रिय भाजीपाल्याला ग्राहकात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहक थेट त्यांच्या शेतात येतात. फक्त चंद्रपुरच नाही तर नागपूर, पुणे येथील ग्राहक सुद्धा त्यांच्या शेताला आवर्जून भेट देतात व भाजीपाला खरेदी करतात असे संगीता उमाटे अभिमानाने सांगतात. त्यांच्या शेतकामात त्यांचे पती लक्ष्मीकांत उमाटे यांचा सुद्धा सहभाग आहे. अवघ्या एक एकर शेतीतून भाजीपाल्याचे पीक घेत उमाटे दापत्याने आर्थिक स्थिरता मिळवली आहे (Success Story).
भाजीपाला विक्रीतून उमाटे दांपत्य रोज पाच ते सहा हजार रुपये कमवतात. ग्राहक थेट शेत गाठून भाजीपाला खरेदी करतात. ग्राहकांपुढेच भाजीपाला काढला जातो. त्यामुळे संगीता यांचा वाहतुकीचा खर्च तर वाचतोच शिवाय भाजीपाला वाया सुद्धा जात नाही.
सेंद्रिय भाजीपाला शेतीकडे कसे वळले? (Starting of organic farming)
लक्ष्मीकांत उमाटे यांच्याकडे ट्रक होता. त्यांनी ट्रक विकून शेती करायला सुरुवात केली. वडलोपार्जित मिळालेली एक एकर पडीक जागेवर त्यांनी शेती फुलविली. परंपरागत, खर्चिक शेतीच्या शेती मागे न लागता सेंद्रीय शेतीकडे वळले आणि काही काळातच त्यांनी सेंद्रिय शेतकरी म्हणून नाव व पैसा दोन्ही कमवला. योग्य नियोजन आणि मेहनत केल्यास शेती फायद्याची करता येते हे संगीता उमाटे यांनी सिद्ध करून दाखविले आहे (Success Story) .