हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक यासारख्या आघाडीच्या ऊस उत्पादक राज्यांमध्ये गाळप सुरू होऊन साखर उत्पादनास (Sugar Production) सुरुवात झाली आहे. मात्र यावर्षी हंगामाच्या पहिल्या पंधरवड्यात साखर उत्पादन (Sugar Production) मागील वर्षीच्या तुलनेत खूपच कमी झाले आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत देशभरात 12.75 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 20.20 लाख टन इतके नोंदवले गेले होते. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत 7.45 लाख टन साखर उत्पादन कमी झाले आहे.
राज्यांचा विचार करता यावर्षी उत्तरप्रदेशात आतापर्यंत 3.40 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 3.60 लाख टन इतके नोंदवले गेले होते. महाराष्ट्रात आतापर्यंत 2.40 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 8.60 लाख टन इतके नोंदवले गेले होते. याशिवाय कर्नाटकमध्ये यावर्षी आतापर्यंत 4.30 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 6.10 लाख टन इतके नोंदवले गेले होते.
महाराष्ट्रात केवळ एक चतुर्थांश उत्पादन
महाराष्ट्रातील साखर उत्पादनात यावर्षीच्या हंगामात मोठी घट होण्याची शक्यता आहे. राज्यात 1 नोव्हेंबरपासून गाळपास सुरुवात झाली आहे. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्यांनी अधिक दर देण्याच्या मागणीसाठी राज्यात आंदोलन तीव्र झाले आहे. त्यामुळे कारखान्यांना ऊसाची पूर्तता होण्यास अडचण निर्माण होत आहे. परिणामस्वरूप राज्यात आतापर्यंत केवळ एक चतुर्थांश साखर उत्पादन होऊ शकले आहे. उत्तरप्रदेशमध्ये सध्या सामान्य पातळीवर साखर उत्पादन सुरू आहे. तर गुजरात, तामिळनाडू, बिहार या राज्यांमध्ये चांगले साखर उत्पादन सुरू आहे.
या राज्यांमध्ये उत्पादन वाढले (Sugar Production In India)
गुजरातमध्ये आतापर्यंत 80 हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. जे मागील वर्षी कालावधीत 60 हजार टन इतके नोंदवले होते. बिहारमधील साखर कारखान्यांनी आतापर्यंत 20 हजार टन साखर उत्पादन केले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 15 लाख टन इतके नोंदवले गेले होते. याशिवाय तामिळनाडूमधील साखर कारखान्यांनी आतापर्यंत 1.30 लाख टन साखर उत्पादन केले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 90 हजार टन इतके नोंदवले गेले होते.
हरियाणामध्ये साखर कारखान्यांनी आतापर्यंत 10 हजार टन साखर उत्पादन केले आहे. उत्तराखंडमध्ये यावर्षी आतापर्यंत 10 हजार टन साखर उत्पादन झाले आहे. जे मागील वर्षी कालावधीत 15 लाख टन इतके नोंदवले गेले होते. आंध्रप्रदेशमधील साखर कारखान्यांनी मागील वर्षी 15 नोव्हेंबरपर्यंत गाळपास सुरुवात केलेली नव्हती. मात्र यावर्षी हंगामातील पहिल्या पंधरवड्यात आंध्रप्रदेशात आतापर्यंत 15 हजार टन साखर उत्पादन झाले आहे.