हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सद्यस्थितीत 133 साखर कारखान्यांनी आपले गाळप (Sugar Production) सुरू केले आहे. यात 63 सहकारी तर 70 खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. या सर्व साखर कारखान्यांनी आतापर्यंत एकूण 61.53 लाख टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे राज्यात आतापर्यंत 43.83 लाख क्विंटल साखर उत्पादीत (Sugar Production) झाली आहे. तर सध्या राज्यात साखर रिकव्हरी दर हा 7.12 टक्के इतका आहे. असे राज्याच्या साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.
मागील हंगामात 2022-23 याच कालावधीत 174 साखर कारखान्यांनी आपले गाळप सुरू केले होते. तर 120.4 लाख टन उसाचे गाळप करत त्याद्वारे 97.25 लाख क्विंटल साखर मागील हंगामात या साखर कारखान्यांनी उत्पादित केली होती. मात्र या वर्षी साखरेच्या रिकव्हरी दरातही मोठी घसरण झाली आहे. असेही आयुक्तालयाच्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.
सोलापूर विभाग (Sugar Production In Maharashtra)
राज्यातील सोलापूर विभागात आतापर्यंत 35 साखर कारखान्यांनी आपले गाळप सुरू केले आहे. या साखर करखान्यांनी 16 नोव्हेंबर 2023 पर्यंत 15.18 लाख टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे 10.26 लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. सोलापूर विभागात यावर्षी साखरेचा रिकव्हरी दर 6.76 टक्के इतका राहिला आहे. असेही आयुक्तालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.
नागपूर, अमरावती विभाग
नागपूर विभागात आतापर्यंत (16 नोव्हेंबर 2023) एकही साखर कारखान्याने आपले गाळप सुरू केलेले नाही. राज्यात अमरावती विभागात सर्वात कमी साखर कारखान्यांनी आपले गाळप सुरू केले आहे. अमरावती विभागात केवळ 2 साखर कारखान्यांनी आपले गाळप सुरू केले आहे. दरम्यान, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले आंदोलन तीव्र केल्याने त्या ठिकाणी अनेक कारखान्यांचे गाळप पूर्ण क्षमतेने सुरु होऊ शकले नाही. आंदोलनामुळे साखर कारखान्यांना ऊस पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. परिणाम याचाही साखर उत्पादनातील घटीवर परिणाम दिसून येत आहे.