हॅलो कृषी ऑनलाईन : ‘2023-24 च्या ऊस गाळप हंगामात (Sugar Production) 29 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी 126.75 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar Production) केले आहे. राज्यात आतापर्यंत 161.86 लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्याद्वारे 7.83 टक्के इतका साखरेचा उतारा मिळाला आहे.’ अशी माहिती राज्याच्या साखर आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आली आहे.
साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, 2023-24 च्या ऊस गाळप हंगामात (Sugar Production) राज्यातील आतापर्यंत 172 कारखान्यांनी आपले गाळप सुरु केले आहे. यामध्ये 84 सहकारी तर 88 खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत 161.86 लाख टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे राज्यात 126.75 लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. दरम्यान, मागील वर्षी याच कालावधीत राज्यातील 188 साखर कारखान्यांनी आपले गाळप सुरु केले होते. तर मागील वर्षी 188 कारखान्यांनी 29 नोव्हेंबर 2022 पर्यंत 226.11 लाख टन ऊस गाळप केला होता. त्यातून मागील वर्षी याच कालावधीत 196.47 लाख क्विंटल साखर उत्पादित झाली होती.
सोलापूरमध्ये सर्वाधिक गाळप (Sugar Production In Maharashtra)
महाराष्ट्रात आतापर्यंत सोलापूर विभागात सर्वाधिक 42 साखर कारखान्यांनी आपले गाळप सुरु केले आहे. सोलापूर विभागातील या साखर कारखान्यांनी आतापर्यंत 37.07 लाख टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे 26.86 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन मिळाले आहे. यासाठी सोलापूर विभागातील कारखान्यांना 7.25 टक्के इतका साखर उतारा मिळाला आहे. असे साखर आयुक्तालयाने आपल्या आकडेवारीत म्हटले आहे.
याउलट नागपूर विभागात आतापर्यंत एकही साखर कारखान्याने आपले गाळप सुरु केलेले नाही. तर राज्यातील सर्वात कमी गाळप अमरावती विभागात झाले असून, त्या ठिकाणी केवळ दोन साखर कारखान्यांनी आतापर्यंत आपले गाळप सुरू केले आहे. असेही साखर आयुक्तालयाने आपल्या आकडेवारीत म्हटले आहे. दरम्यान, ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील गाळपास काहीसा ब्रेक लागला होता. मात्र, त्याबाबत तोडगा निघाल्यानंतर आता या दोन्ही जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून ऊस गाळपास वेग आल्याचे सांगितले जात आहे.