हॅलो कृषी ऑनलाईन। भारत साखर उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर तर साखर निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा साखरेचे एकूण उत्पादन ३. ५ टक्क्यांनी घटणार असल्याचे सांगितले आहे. या हंगामी वर्षात महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हवामानातील बदलाचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर होणार आहे. परिणामी साखर निर्यातीवर यामुळे मर्यादा येतील व निर्यात घटेल असे इस्माचे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी म्हटले आहे. यासर्वाचा देशातील साखरेच्या किमतींवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
निर्यातीवर मर्यादा येऊ शकतात –
ऑक्टोम्बर २०२२ या हंगामामध्ये साखरेचे उत्पादन हे ३६.५ दशलक्ष टन होण्याचा अंदाज इस्माने बांधला होता. परिस्थितीनुसार हा अंदाज घटत्या दिशेने आहे. जानेवारीमध्ये हा अंदाज कमी होऊन ३४ दशलक्ष टनावर गेला असून आता हा अंदाज ३२.८ दशलक्ष टनावर पोहचला आहे. मागील हंगामात महाराष्ट्रामध्ये साखरेचे उत्पादन १३.७ दशलक्ष टन होते. मात्र यंदाच्या वर्षी हे प्रमाण १०.५ दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे. चालू वर्षांमध्ये केंद्र सरकारने ६.१ दशलक्ष टन निर्यातीला परवानगी दिली आहे. पण अंदाजापेक्षा कमी उत्पादन होणार असल्यामुळे आता निर्यातीवर मर्यादा येऊ शकतात .
उत्पादन कमी परिणामी निर्यातीच्या प्रमाणात घट –
निर्यात कमी झाली तर आपल्या देशाला परकीय चलन प्राप्त होणार नाही. याचाच परिमाण अर्थव्यवसंस्थेवर कमी अधिक प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे किमतीत वाढ होण्याची मोठी शक्यता असते. ज्या देशामध्ये साखर उत्पादन जास्त झाले आहे त्या देशांना निर्यातीसाठी वाव भेटेल. भारत हा साखर निर्यातीमध्ये जगातील एक प्रमुख देश आहे. भारत प्रामुख्याने इंडोनेशिया, सुदान, बांगलादेश, मलेशिया इत्यादी देशांना साखर निर्यात करतो. परंतु यंदा साखरेचे उत्पादन कमी झाल्यामुळे निर्यातीच्या प्रमाणात घट दिसून येणार आहे.