हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस (Sugarcane) गाळप हंगाम शेवटाला आला असून, सध्या अनेक साखर कारखाने आपले गाळप थांबवत आहे. अशातच आता साखर उत्पादनाची नवीन आकडेवारी समोर आली आहे. राज्यात 2023-24 च्या गाळप हंगामात आतापर्यंत अर्थात 18 मार्च 2024 पर्यंत एकूण 1012.69 लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्याद्वारे राज्यात एकूण 1034.52 लाख क्विंटल अर्थात 102.84 लाख टन साखर उत्पादित झाली आहे. अशी माहिती राज्याच्या साखर (Sugarcane) आयुक्तालयाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.
73 कारखान्यांनी गाळप थांबवले (Sugarcane 102.84 Lakh tonnes Sugar Produced In Maharashtra)
राज्यात यंदाच्या गाळप हंगामात एकूण 207 साखर (Sugarcane) कारखान्यांनी आपले गाळप सुरु केले होते. यामध्ये 103 सहकारी आणि 104 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. मात्र, सध्याच्या घडीला राज्यातील एकूण ७३ साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. प्रभाव क्षेत्रातीलस शेतकऱ्यांकडील ऊस संपल्याने संबंधित कारखाना प्रशासनाने हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षी याच कालावधीत एकूण 148 साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत कमी साखर उत्पादन झाले आहे.
18 मार्चपर्यंत विभागनिहाय साखर उत्पादन
- कोल्हापुर विभाग : 266.84 लाख क्विंटल
- पुणे विभाग : 232.24 लाख क्विंटल
- सोलापुर विभाग : 192.38 लाख क्विंटल
- अहमदनगर विभाग : 127.94 लाख क्विंटल
- छत्रपती संभाजी नगर विभाग : 82.99 लाख क्विंटल
- नांदेड विभाग : 115.16 लाख क्विंटल
- अमरावती विभाग : 8.78 लाख क्विंटल
- नागपुर विभाग : 2.12 लाख क्विंटल
मार्च अखेरपर्यंत हंगाम आटोपणार
राज्यात गाळप संपलेल्या कारखान्यांमध्ये सार्वधिक कारखाने हे पुणे विभाग, सोलापूर विभाग आणि मराठवाडा विभागातील आहे. अशातच आता राज्यातील अनेक भागांमध्ये ऊस आटोपला असून, मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत बहुतांश कारखाने आपले गाळप थांबवण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांचे गाळप एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे.