हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस गाळप हंगाम शेवटाला आला की शेतकऱ्यांच्या उसाच्या थकबाकीची (Sugarcane FRP) सर्वाधिक चर्चा होते. मार्च महिना संपला असून, आता अवघे काही दिवसच राज्यात गाळप सुरु राहणार आहे. अशातच यावर्षीच्या गाळप हंगामातील एकूण 29 हजार 696 कोटीची रक्कम राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली आहे. तर यावर्षी राज्यात एफआरपीनुसार एकूण 31 हजार 510 कोटी रुपयांच्या उसाचे गाळप झाले आहे. अर्थात राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या उसाचे एकूण 94.24 टक्के थकबाकीची रक्कम (Sugarcane FRP) मिळाली आहे. असे राज्याच्या साखर आयुक्तालयाच्या माहितीतून समोर आले आहे.
1814 कोटींची थकबाकी शिल्लक (Sugarcane FRP For Farmers)
साखर आयुक्तालयाच्या माहितीनुसार, “राज्यातील शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून आणखी 1 हजार 814 कोटी रुपयांची थकबाकी मिळणे बाकी आहे. यंदा राज्यात हंगामाच्या सुरुवातीला 207 कारखान्यांनी आपले गाळप सुरु केले होते. यातील जवळपास 110 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाची सर्व रक्कम चुकती केली आहे. तर 52 साखर कारखान्यांनी 80 ते 99 टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. याशिवाय 29 कारखान्यांनी शेतकऱ्यांना आपल्या एकूण रकमेपैकी 60 ते 79 टक्के रक्कम अदा केली आहे. तर 15 कारखान्यांनी 0 ते 59 टक्के या प्रमाणात शेतकऱ्यांना त्यांची थकबाकी चुकती केली आहे.”
96 कारखान्यांकडे थकबाकी शिल्लक
दरम्यान, यंदा महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक आर्थिक मार्ग यंदा काहीसे ठप्प असल्याचे पाहायला मिळाले. ऊस या बारमाही पिकाला अधिकचे पाणी लागते. मात्र, यंदा कमी पाऊस असूनही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्राला साखर उत्पादनात सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवले आहे. अशातच आता राज्यातील जवळपास 96 साखर कारखान्यांकडे अजून शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम शिल्लक आहे. खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पुढील वर्षीच्या भांडवलासाठी कारखान्यांकडे तगादा लावला जात आहे. त्यामुळे उर्वरित कारखान्यांनी शेतकऱयांना त्यांची थकबाकी वेळेत द्यावी, असे साखर आयुक्तालयाने म्हटले आहे.