हॅलो कृषी ऑनलाईन : चालू गाळप हंगामात उसाला प्रतिटन 3500 दर रूपये मिळावा, तसेच मागील हंगामातील उसाला 400 रुपये (Sugarcane Rate) अतिरिक्त देण्यात यावे. या मागणीसाठी आज (ता.19) सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन (Sugarcane Rate) करण्यात आले. या आंदोलनामुळे इस्लामपूर-सांगली, गुहागर-विजापूर, पलूस-सांगली या प्रमुख मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 400 रूपयांचा दुसरा हप्ता देण्यात यावा. या मागणीसाठी गेल्या एक महिन्यापासून स्वाभिमानीने आंदोलन सुरू ठेवले आहे. मात्र, साखर कारखान्यांकडून याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. या मागणीसाठी झालेल्या दोन बैठका निष्फळ ठरल्याने आज स्वाभिमानीकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते.
राष्ट्रीय महामार्ग रोखणार (Sugarcane Rate Issue In Maharashtra)
“आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागच्या वर्षीच्या ऊसाला चारशे रुपये घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. आज आम्ही चक्काजाम करत सरकारला इशारा देत आहे. त्यामुळे 21 नोव्हेंबरपर्यंत अंतिम निर्णय झाला नाही तर पुढच्या रविवारी (ता.26) राष्ट्रीय महामार्ग रोखणार असल्याचे राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले आहे.
पोलीसांचा कडक बंदोबस्त
इस्लामपूर मार्गावरील लक्ष्मी फाटा येथे, गुहागर विजापूर मार्गावरील पलूस येथे, पलूस मार्गावरील नांद्रे येथे कवठेमहांकाळ मार्गावरील शिरढोण येथे आणि बोरगाव फाटा, तुरची आदी ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक खंडित झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.