हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाचे वर्ष तसे शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकासाठी (Tomato Rate) चांगले राहिले नाही. खरीप हंगाम पावसाअभावी हातचा गेला. रब्बीतही शेतकऱ्यांच्या शेतमालाची तीच गत होती. इतके सर्व करूनही काही शेतकऱ्यांनी अगदी कमी पाण्यावर उन्हाळी टोमॅटो पीक घेतले. मात्र, आता हेच टोमॅटो शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारात ओतून देण्याची वेळ आली आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव बाजार समिती व्यापारी टोमॅटो खरेदीसाठी न आल्याने शेतकऱ्यांनी आपला टोमॅटो (Tomato Rate) बाजार समिती आवारात ओतून दिल्याबाबतचा एक व्हीडिओ सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहे.
‘शेतकऱ्यांना वाली नाही’ (Tomato Rate Farmer Poured Into Market)
नाशिक जिल्ह्यात गेले काही दिवस बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्याचा परिणाम पुणे जिल्ह्यातील जुन्नर, नारायणगाव बाजार समित्यांमध्येही पाहायला मिळाला. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या शुक्रवारी (ता.१२) पूर्ववत झाल्या. मात्र, बंदनंतर शुक्रवारी नारायणगाव बाजार समितीमध्ये व्यापारी लिलावासाठी वेळेत न आल्याने, संताप अनावर झालेल्या शेतकऱ्यांनी आपला टोमॅटो बाजार समितीत ओतून दिल्याचे समोर आले आहे. यावेळी शेतकऱ्यांना कोणी वाली नसल्याचे म्हणत, इतक्या तुटपुंज्या दरात (Tomato Rate) शेतकऱ्यांना मजुरीही मिळत नाही. त्यातच व्यापारी शेतकऱ्यांना नाडतात, असे म्हणत शेतकऱ्यांनी टोमॅटो ओतून आपला राग व्यक्त केला आहे.
तुटपुंज्या दरात मजुरीही मिळेना!
सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला सरासरी 8 ते 10 रुपये प्रति किलोचा दर (Tomato Rate) मिळत आहे. या दरात शेतकऱ्यांना मजूरी देखील मिळत नाही. मग इतके उन्हाळाभर जीव ओतून, कष्ट करत, पिकांना दुष्काळात उपलब्ध ते पाणी देऊन काय उपयोग? असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित व्हिडीओमध्ये दोन पीकअपमधील शेतकरी आपला टोमॅटो रस्त्यावर ओतत होते. इतर शेतकऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशातही हे शेतकरी राग अनावर झाल्याने टोमॅटो ओतताना दिसून येत आहे. त्यामुळे आता कांदा, सोयाबीननंतर टोमॅटो उत्पादक शेतकरी देखील विवंचनेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.