हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात कडधान्य पिकांमध्ये तूर या कडधान्याची (Tur Production) मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यात प्रामुख्याने राज्यातील कोरडवाहू भागातील शेतकरी मोठ्या संख्येने तुरीची लागवड करतात. विशेष म्हणजे तुरीला बाजारात नेहमीच मागणी असल्याने तिला अधिकचा दर देखील मिळतो. सध्या तुरीला राज्यातील बाजार समित्यांमध्ये प्रति क्विंटल 10,500 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का? देशातील सर्वाधिक तूर पिकाचे उत्पादन घेणारी पहिली पाच राज्य कोणती आहेत? त्यात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? आणि महाराष्ट्रात एकूण किती तुरीचे उत्पादन (Tur Production) घेतले जाते? आज आपण तुमच्या मनातील या सर्व प्रश्नांची उत्तरे या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र प्रथम स्थानी (Tur Production Top Five States In India)
देशातील दक्षिण-मध्य पट्ट्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी तुरीचे पीक घेतात. तर उत्तरेकडे देखील काही राज्यांमध्ये बऱ्यापैकी तूर लागवड केली जाते. मात्र, देशातील एकूण तुरीच्या उत्पादनापैकी (Tur Production) महाराष्ट्रात सर्वाधिक तुरीचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र हे राज्य देशातील तूर उत्पादनापैकी जवळपास 38.70 टक्के उत्पादनासह पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यातील विदर्भ-मराठवाड्यासह खानदेश पट्ट्यात शेतकऱ्यांकडून मोठ्या तुरीची लागवड केली जाते.
‘हे’ आहेत प्रमुख तूर उत्पादक राज्य
देशात महाराष्ट्रानंतर सर्वाधिक तूर लागवड कर्नाटक या राज्यात होते. त्या ठिकाणी देशातील एकूण तूर उत्पादनापैकी (Tur Production) एकूण 26.39 टक्के तुरीचे उत्पादन होते. त्यामुळे 26.39 टक्के तूर उत्पादनासह देशात कर्नाटक राज्य दुसऱ्या स्थानी आहे. तर कर्नाटकानंतर सर्वाधिक तूर उत्पादन हे मध्यप्रदेश या राज्यात होते. त्या ठिकाणी देशातील एकूण तूर उत्पादनापैकी 14.51 टक्के तूर उत्पादन घेतले जाते. अर्थात तूर उत्पादनात तिसरा क्रमांक मध्यप्रदेश या राज्याचा आहे. यानंतर तूर उत्पादनात देशात उत्तरप्रदेश हे राज्य चौथ्या तर तेलंगणा हे राज्य पाचव्या क्रमांकावर आहे.
तुरीचे आहारातील महत्व
तूर डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. ज्यामुळे भारतातच नव्हे तर जगभरात तुरीचा आहारात मोठ्या प्रमाणात समावेश केला जातो. मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल असलेल्या रूग्णांनी तूर डाळीचे नियमित सेवन केल्याने त्यांच्या रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्यामुळेच अशा लोकांनी आहारात नियमित तूर डाळीचा समावेश करावा. असा सल्ला डॉक्टर त्यांना अनेकदा देत असतात.