हॅलो कृषी ऑनलाईन : गेले दोन राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट जोरदार गारपीट (Unseasonal Rain) झाली. यात जालना जिल्ह्याला सार्वधिक फटका बसला असून, जिल्ह्यातील 11 हजार 691 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने गहू, ज्वारी, हरभरा सह फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यात एकूण 7 जनावरे दगावले असून, 2 जणांचा वीज पडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आज जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची (Unseasonal Rain) जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पाहणी केली. त्यावेळी ही आकडेवारी समोर आली आहे.
20 हजार 800 शेतकऱ्यांना फटका (Unseasonal Rain In Jalna)
जालना जिल्ह्यातील जवळ्पास 66 गावांमध्ये 20 हजार 800 शेतकऱ्यांना या गारपिटीचा फटका बसला आहे. भोकरदन व जाफराबाद या दोन तालुक्यांना या गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पारध, दानापूर, तपोवन,गोंधन, आंबेगाव व टेंभुर्णी या गावांचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांशी नुकसानीबाबत संवाद साधत त्यांना दिलासा दिला आहे. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी, नळहिवरा,काळेगाव, भातोडी तर भोकरदन तालुक्यातील पारध, सिपोरा, वाळसांगवी, पद्मावती गावांना गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे.
तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या भावनांना वाट करून झालेल्या नुकसानीची माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे एकूण घेत उपस्थित शेतकऱ्यांना पिकविमासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे सांगितले. तसेच त्यांच्यासोबत उपस्थित अधिकाऱ्यांना नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार बनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.