हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शनिवारपासून (ता.16) अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पाहायला मिळतोय. अशातच आता भर उन्हाळ्यात महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असलेल्या तेलंगणा राज्यात देखील पावसाने धुमाकूळ घातल्याचे समोर आले आहे. गेले दोन दिवस तेलंगणामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जवळपास 26000 एकरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत तेलंगणाच्या कृषी विभागाकडून (Unseasonal Rain) अधिकृत आकडेवारी जारी करण्यात आली आहे.
दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान (Unseasonal Rain In Telangana)
विदर्भात प्रामुख्याने नागपूर, तर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याला गेले दोन दिवस अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) चांगलेच झोडपून काढले. नागपुरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर नागपूरच्या ग्रामीण भागात गहू, हरभरा या रब्बी पिकांसह संत्री बागांचे मोठे नुकसान झाले. तर आज (ता.18) विदर्भातील काही जिल्ह्यांसह वाशीम जिल्ह्यात पाऊस झाल्याचे वृत्त आहे. त्यातच आज मागील दोन दिवस तेलंगणा राज्यात झालेल्या अवकाळी पावसाची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने तेलंगणाच्या कामारेड्डी आणि निजामाबाद या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. प्रामुख्याने उन्हाळी हंगामात पिके विरळ असताना ही नुकसानीची आकडेवारी तुलनेने अधिक असल्याचेही तेलंगणाच्या कृषी विभागाने म्हटले आहे.
कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे
तेलंगणा राज्याच्या कामारेड्डी आणि निजामाबाद जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. कृषी विभागाने कामारेड्डी जिल्ह्यात 130 गावांमध्ये, तर निजामाबाद जिल्ह्यात 44 गावांमध्ये पाहणी केली. ज्यात शेतकऱ्यांचे धान, मका आणि ज्वारी या पिकांना सर्वाधिक फटका बसल्याचे आपल्या अहवालात म्हटले आहे. यावेळी पाहणीसाठी गेलेल्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना धीर देत पीक विमा योज़नेसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. तसेच झालेल्या नुकसानीची आकडेवारी राज्य सरकारला सादर करण्यास विश्वास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला आहे.
इतकेच नाही तर पुढील तीन दिवस तेलंगणातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांत तेलंगणातील शेती पिकांच्या नुकसानीची आकडेवारीत आणखी वाढ होऊ शकते. असेही कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.