हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू झाल्यामुळे राज्यात या आठवड्यात कडाक्याची थंडी (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला की, राज्यात हळूहळू थंडी जाणवायला सुरवात होते. मात्र दोन आठवडे संपूनही उत्तर महाराष्ट्र वगळता अन्य भागात थंडीने पाहिजे तसा जोर धरला नव्हता. मात्र आता संपूर्ण राज्यात थंडीची (Weather Update) लाट जोर धरण्याची शक्यता आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने म्हटले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, “हिमालय व उत्तर भारतातील काही भागांमध्ये बर्फवृष्टी झाली असून, त्याच्या प्रभावामुळे लवकरच राज्यात थंडीचा जोर काहीसा वाढणार आहे. त्यातच राज्यातील अवकाळी पावसाचे वातावरण निवळले असून, राज्याच्या बहुतांश भागांमधील किमान तापमानात आता घट होण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरीही बंगालच्या उपसागरात होणाऱ्या हालचाली आणि त्यामुळे निर्माण होणारा कमी दाबाचा पट्टा राज्यावर काही परिणाम करतो का? याकडेही हवामान विभाग लक्ष ठेऊन आहे.”
निफाडचा पारा १२ अंशावर (Weather Update)
नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये तापमान 12 अंशापर्यंत खाली आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही तापमानात मोठी घट झाली आहे. कोकणातील अवकाळी पावसाचे सावट निवळले असून, या भागातील कमाल तापमानातही घट नोंदवली जात आहे. एकंदर चित्र पाहता राज्यात येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तापमानात लक्षणीय चढ-ऊतार पाहायला मिळू शकतो.
कमी दाबाचा परिणाम नाही
हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली होती. 15 नोव्हेंबरला कमी दाबाच्या पट्ट्याची ही प्रणाली आणखी तीव्र होऊन आता पुढे हेच वारे उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दिशेने किनाऱ्याला लागूनच पुढे जाणार आहेत. त्यामुळे दक्षिण भारतामध्ये याचे परिणाम पावसाच्या तुरळक सरींच्या रुपात दिसू शकतात. राज्यात मात्र या कमी दाब क्षेत्राचा फारसा परिणाम दिसून येणार नाही, असे हवामान विभागाने म्हटले आहे.