Weather Update : बुलढाण्यात पावसाने झोडपले, सांगली, कोल्हापूरातही हजेरी; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हवामानात (Weather Update) विलक्षण बदल पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त (Weather Update) करण्यात आला आहे.

दरम्यान, दक्षिणेकडील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज (ता.5) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक पाऊस (Weather Update) सुरु होऊन, वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सुमारे 15 मिनिटे चाललेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर तिकडे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातही नवीन वर्षातील पहिला पाऊस चांगलाच बरसल्याचे पाहायला मिळाले. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात आव्हा, तळणी, लिहा, पिंप्री गवळी या परिसरासह इतर गावांमध्ये गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पाहायला मिळाला. या पावसामुळे परिसरातील गहू, तुर, मका, हरभरा, जनावरांच्या चाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता (Weather Update Today 5 Jan 2024)

त्यातच आता पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. यात प्रामुख्याने शुक्रवारी सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमधील अनेक भागांमध्ये तुरळक पाऊस पाहायला मिळू शकतो. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकसह अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवार आणि शनिवार असे दोनही दिवस भाग बदलत मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबई आणि आसपास परिसरांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते. असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

वाऱ्यांची चक्राकार स्थिती तयार

दरम्यान, आग्नेय अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाब क्षेत्र निवळले असून, त्यानंतर आता लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम असून, उत्तर कर्नाटकपासून ते उत्तर प्रदेशपर्यंतच्या भारतातील राज्यांपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वातावरणात बदल होऊन, राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

error: Content is protected !!