हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यावरील अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) संकट कायम आहे. मागील चार दिवसांपासून अतिपूर्वेकडील जिल्हा (Weather Update) असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर ते उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार तर अतिदक्षिणेकडील जिल्हा असलेल्या सोलापूरपर्यंतच्या भागामध्ये पावसाचे (Rain) थैमान सुरूच आहे. अशातच आता येत्या 24 तासांमध्ये राज्यात विदर्भ पट्ट्यातील जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Weather Update) आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (IMD) व्यक्त करण्यात आला आहे.
‘या’ भागांना दक्षतेचा इशारा (Weather Update Today 13 April 2024)
राज्यात मागील चार दिवसांमध्ये सोलापूर, परभणी, लातूर, बीड, संभाजीनगर, नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, नांदेड, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली. तर काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट देखील पाहायला मिळाली आहे. त्यातच पुढील 24 तासांमध्ये सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. असे हवामान विभागाने (IMD) आपल्या अंदाजात म्हटले आहे.
अनेक राज्यात पावसाची नोंद
याउलट मागील 24 तासांमध्ये राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या काही भागांमध्ये वादळी वारा, मेघगर्जनेसह पाऊस (Weather Update) झाला आहे. तर तेलंगणा, केरळ, दक्षिण तामिळनाडू, ईशान्य बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यांमध्येही पावसाची नोंद झाली आहे. तर जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये हिमवृष्टी नोंदवली गेली आहे.
उकाड्यापासून दिलासा
दरम्यान, सध्या महाराष्ट्रासह उत्तरेकडील हिमालयीन राज्य आणि दक्षिणेकडील तामिळनाडू भागातही पाऊस होत आहे. परिणामी, या पावसामुळे महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भागांमध्ये दिवसाच्या तापमानात काहीशी घट नोंदवली गेली आहे. प्रामुख्याने राज्यात मालेगाव वगळता सध्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याचे दिसून आले आहे. ज्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.