हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवडाभर राज्यातील काही भागांमध्ये थंडी (Weather Update), काही भागांमध्ये ढगाळ हवामानासह गारपीट व पाऊस तर काही भागांमध्ये उन्हाची काहिली असे संमिश्र हवामान पाहायला मिळत होते. मात्र, आता राज्यातून थंडीने बऱ्यापैकी काढता पाय घेतला आहे. याशिवाय पूर्व महाराष्ट्रावर असलेले पावसाचे ढग देखील पूर्णपणे निवळले आहे. मात्र, राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सध्या कमाल तापमानात 35 अंश सेल्सिअसहून (Weather Update) अधिक नोंदवली गेली आहे.
‘या’ ठिकाणी तापमानात मोठी वाढ (Weather Update Today 18 Feb 2024)
मागील आठवडाभर केवळ सोलापुरात 35 अंश सेल्सिअसहून अधिक तापमान पाहायला मिळत होते. मात्र हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी 36.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर सोलापूर – 37.4, जेऊर (करमाळा) – 37, रत्नागिरी – 36.3, ठाणे – 36, पुणे – 35.3, सांगली – 35.1, धाराशिव – 35 या ठिकाणी देखील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसहून अधिक नोंदवले गेले आहे. तर मुंबई येथे 33.8, कोल्हापूर – 34.7 आणि सातारा येथे 34.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
17 Feb Maharashtra Tmax 35°C plus.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 17, 2024
कमाल तापमान.
Jalgaon 36.7°C
Satara 34.5
Thane 36
Pune 35.3
Mumbai 33.8
Sangli 35.1
Kolhapur 34.7
Jeur 37
Solapur 37.4
Dharashiv 35
Ratnagiri 36.3
किमान तापमानातही मोठी वाढ
याशिवाय राज्यातील थंडीने काढता पाय घेतला असून, किमान तापमानत देखील मोठी वाढ दिसून येत आहे. मागील आठवडाभर नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी किमान तापमान 10 अंशाहून खाली घसरलेले होते. मात्र, मागील 24 तासांमध्ये निफाड 14 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले आहे. तर राज्यात अन्य भागांमध्ये सध्या 14 ते 21 अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमान असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय उत्तर भारतातही अनेक भागांमध्ये निच्चांकी किमान तापमान 6 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. त्यामुळे आता सकाळच्या सुमारास जाणवणारी अल्प थंडी लवकर गायब होण्याची शक्यता आहे.