हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील काही भागांमध्ये पावसाचे वातावरण (Weather Update) निवळले आहे. प्रामुख्याने सध्या उत्तर-मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान पाहायला मिळत आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे. मात्र, असे असले राज्यातील प्रामुख्याने दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण कायम असून, आज (ता.19) आणि उद्या (20) अर्थात येत्या 48 तासांमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता (Weather Update) असल्याचे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.
विदर्भात पावसाची विश्रांती (Weather Update Today 19 April 2024)
दरम्यान, सध्याच्या घडीला राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राचा काही भाग, पूर्वेकडील विदर्भाच्या भागात पावसाचे वातावरण (Weather Update) काहीसे निवळले आहे. मात्र, पुढील दोन दिवसांनंतर अर्थात 21 ते 24 एप्रिल या कालावधीत नागपूर आणि आसपासच्या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुन्हा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच या कालावधीत विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कमाल तापमानात मोठी वाढ
सध्यस्थितीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांहून अधिक अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात एकत्रितपणे उच्चांकी 43.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर जळगाव, सोलापूर, धुळे, वाशीम, अकोला या जिल्ह्यांमध्ये देखील तापमानाचा पारा हा 42 अंशांहून अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याच्या इतर सर्वच भागात कमाल तापमान हे 39 ते 41 अंश सेल्सिअस इतके पाहायला मिळत आहे.
‘या’ राज्यांमध्येही पावसाची शक्यता
उत्तरेकडील राज्यांमध्ये पाकिस्तानच्या वायव्य भागातून एक चक्रीय वाऱ्यांच्या झोत उत्तरेकडील राज्यांमध्ये दाखल होत आहे. ज्यामुळे महाराष्ट्रासोबतच पुढील 48 तासांमध्ये या भागात प्रामुख्याने जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. याशिवाय देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.