हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अखेर थंडीची चाहूल लागली आहे. अनेक भागात किमान तापमान (Weather Update) १० अंशांच्या खाली घसरले आहे. मध्य महाराष्ट्र,मराठवाडा या भागात गारठा चांगलाच वाढला आहे. हे हवामान गहू पेरणीसाठी चांगले मानले जाते. त्यामुळे राज्यात गव्हाच्या पेरणीला वेग आला आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात थंडी कायम राहणार असून किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
हवामान स्थिती ?
बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) श्रीलंकेच्या जाफनापासून ५२० किलोमीटर ईशान्येकडे, काराईकलपासून ४७० किलोमीटर ईशान्येकडे, मच्छलीपट्टणमपासून आग्नेयेकडे ५५० किलोमीटर, चेन्नईपासून ४२० किलोमीटर आग्नेयेकडे होते. वायेव्यकडे सरकणारी ही प्रणाली सोमवारी (ता.२१) रात्री उशिरापर्यंत तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला (Weather Update) धडकण्याची शक्यता आहे. किनाऱ्याला धडकताच आज (ता. २२) सकाळपर्यंत ही प्रणाली हळूहळू निवळण्याची शक्यता आहे.
राजस्थान येथील चुरू येथे सोमवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत निचांकी ६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रात निफाड येथील गहू संशोधन केंद्रात निचांकी ७ अंश, तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आवारातही किमान तापमान ८ अंश सेल्सअस तापमानाची नोंद झाली. धुळे आणि निफाडसह, जळगाव, नाशिक, पुणे औरंगाबाद, परभणी, आणि यवतमाळ येथे किमान तापमानाचा पारा १० अंश किंवा त्यापेक्षा अधिक घसरला असून, किमान तापमानात ४.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्याने थंडीची लाट आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी दिवसाही गारठा जाणवत आहे.
कुठे किती तापमान ?(Weather Update)
सोमवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे २८.३ (८.८), नगर – (१०.१), जळगाव २९.३ (८.२), धुळे २८.० (७.४), कोल्हापूर २८.२ (१४.८), महाबळेश्वर २४.२(१०.४), नाशिक २७.१ (९.२), निफाड २९.२ (७.०), सांगली २९.२(१२.५), सातारा २८.५(१३.०), सोलापूर ३१.० (१२.७), सांताक्रूझ ३२.१(१७.०), डहाणू ३१.८ (१६.५), रत्नागिरी ३२.६ (१७.२), औरंगाबाद २८.० (८.९), नांदेड – (१२.६), परभणी २८.५ (११.०), अकोला ३०.१ (१२.०), अमरावती २९.४ (११.७), बुलढाणा २८.२ (११.६), ब्रह्मपूरी ३०.४ (१३.२), चंद्रपूर २७.२ (१३.२), गडचिरोली २८.४(१३.८), गोंदिया २७.८(१०.५), नागपूर २८.० (११.४), वर्धा – (१२.२), वाशीम ३१.४ (१३.२), यवतमाळ २९.५ (१०.०).