हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यावर एकीकडे अवकाळी पावसाचे संकट (Weather Update) कायम आहे. तर दुसरीकडे मुंबईसह ठाणे, कोकण परिसरात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांत जोरदार पावासाची शक्यता आहे. काही जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती तर तुरळक भागात उष्णतेची लाट (Weather Update) येण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना इशारा (Weather Update Today 26 April 2024)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (ता.26) सोलापूर, धुळे, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात पावसाची शक्यता आहे. तर 27 एप्रिलला जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात पावसाची हजेरी पाहायला मिळण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. 26 आणि 27 एप्रिलला धुळे, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस (Weather Update) पाहायला मिळू शकतो. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
उष्णतेच्या लाटेची शक्यता
दरम्यान, मागील 24 तासांमध्ये राज्यात धुळे (42), मालेगाव (42), जळगाव (41.7), सोलापूर (41.2), वाशीम (40.6), ब्रह्मपुरी (40.5), अकोला (40.4), बीड (40.1), वर्धा (40.1), अमरावती (40) या ठिकाणांवरील कमाल तापमान 40 अंशांपेक्षा अधिक असल्याचे पाहायला मिळाले. तर अशातच आता पुढील दोन दिवस मुंबई, ठाणेसह कोकणासाठी हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली असून, उष्णतेचा यलो अलर्टही जारी केला आहे.
पंजाब, हरियाणातही पावसाची शक्यता
राज्यासह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या तडाखा कायम आहे. मात्र, देशाच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरण आल्हाददायक आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेती आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा या राज्यांच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.