हॅलो कृषी ऑनलाईन : मार्च महिना संपताच सूर्याने आग ओकणे (Weather Update) सुरु केले आहे. अशातच आता केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत देशभरात एकामागोमाग उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. प्रशांत महासागरात अल-निनो शेवटच्या टप्प्यात असल्याने, या कालावधीत देशातील अनेक राज्यांमध्ये या उष्णतेच्या लाटा (Weather Update) पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि शेतमजुरांनी या काळात उष्णतेच्या लाटेपासून विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती जारी केली आहे.
मध्य भारतात उन्हाची ताप तीव्र (Weather Update Today)
सध्या महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. वरील सर्व राज्यांमध्ये दिवसाचे तापमान 40 ते 43 अंशांपर्यंत उच्चांकी पातळीवर पाहायला मिळत आहे. ज्यामुळे संपूर्ण मध्य भारतात प्रचंड उकाडा पाहायला मिळत आहे. आणखी दोन दिवस हा उकाडा कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
विदर्भाचा पारा चाळीशीच्या पुढे
महाराष्ट्राचा विचार करता सध्या विदर्भातील सर्वच भागांमध्ये दिवसाचे कमाल तापमान हे 40 अशांहून अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, बीड 40.5, नांदेड 40.8, परभणी 41.2, अकोला 42.2, अमरावती 41.2, चंद्रपूर 41.6, गडचिरोली 40.6, गोंदिया 40.6, नागपूर 41.2, वर्धा 42.5, वाशीम 41.4, यवतमाळ 42.0 अशा सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार आहे.
उर्वरित महाराष्ट्रात मुंबई आणि कोकण परिसर वगळता, राज्यात सर्वत्र उन्हाचा तडाखा कायम आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे. मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यांमध्ये आणि शेजारील गोवा या राज्यामध्ये दिवसा दमटयुक्त उष्णता अनुभवायला मिळणार आहे. तर आठवड्याच्या शेवटी वातावरणात बदल होऊन, पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.