हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठे बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांमध्ये राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ नोंदवली आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्यात 35 अंशांपर्यंत खाली आलेले कमाल तापमान सध्या अनेक भागांमध्ये पुन्हा 39 अंशांपर्यंत वाढले आहे. ज्यामुळे अनेक भागांमध्ये उन्हाचा चटका वाढला आहे. त्यात येत्या काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे. तर याउलट राज्यातील अतिपूर्वेकडील जिल्हा असलेल्या गोंदिया जिल्ह्यात 6 मार्च रोजी पावसाने दमदार हजेरी लावल्याचे वृत्त आहे. ज्यामुळे पावसानंतर जिल्ह्यात सध्या काहीसा सुखद गारवा (Weather Update) जाणवत असल्याचे सांगितले जात आहे.
थंडीमध्ये घट होणार (Weather Update Today 8 March 2024)
फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आणि मार्च महिन्याच्या 2 तारखेपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने भाग बदलत दमदार हजेरी लावली होती. ज्यामुळे गेला आठवडाभर राज्यात पहाटेच्या सुमारास चांगलीच थंडी अनुभवायला (Weather Update) मिळत होती. मात्र, आता किमान तापमान हळूहळू चढतीकडे सरकण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने दोनच दिवसांपूर्वी आपल्या अंदाजात म्हटल्यानुसार, महाशिवरात्रीनंतर राज्यातील थंडीमध्ये घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार आता मागील 24 तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड (9 अंश सेल्सिअस) वगळता राज्यातील सर्वच भागांमध्ये किमान तापमान 10 अंशांच्या वर सरकले आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये पस्तिशी पार
मागील 24 तासांमध्ये वाशीम जिल्ह्यात उच्चांकी 38.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर सोलापूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, परभणी, अकोला, गडचिरोली, सांगली, नांदेड, धुळे, पुणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा सध्या 35 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान असल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीतून पाहायला मिळत आहे. याव्यतिरिक राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये तापमान 30 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले आहे.
देशातही अनेक भागांमध्ये सध्या तापमानात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. अशातच आता देशाच्या पश्चिमी भागातून पुन्हा एक चक्रीय वाऱ्यांचा झोत उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रवेश करणार आहे. ज्यामुळे पुढील आठवड्यात उत्तरेकडील राज्यांमध्ये विशेषतः राजधानी दिल्लीसह आसपासच्या भागांमध्ये पाऊस होऊ शकतो. असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला जात आहे.