हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या वातावरणात कमालीचा बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये गारठा कमी झाला आहे. तर काही भागांमध्ये उन्हाचा चटका वाढला आहे. परिणामी, दुपारच्या सुमारास उकाडा जाणवत आहे. अशातच बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे एक सौम्य कमी दाब क्षेत्र तयार झाले असून, ज्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील विदर्भ-मराठवाड्याच्या भागात पावसाची शक्यता (Weather Update) असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.
‘या’ जिल्ह्यांना इशारा (Weather Update Today 9 Feb 2024)
राज्यात प्रामुख्याने 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. तर मध्य-उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमधील काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्येही या कालावधीत ढगाळ वातावरण राहणार असून, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांमध्ये या कालावधीत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
‘या’ राज्यांनाही पावसाचा इशारा
दरम्यान, उत्तर भारतीय राज्यानंतर पावसाने काहीसे पूर्व भागाकडे लक्ष केंद्रित केले असून, आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिसा, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये या राज्यांना देखील हलका ते तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसरातील कमी दाबामुळे पूर्वेकडील राज्यांमध्ये हा पाऊस होणार आहे. तसेच या सौम्य कमी दाब पट्ट्याचा प्रभाव भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम किनारपट्टीहून राज्यातील विदर्भातील जिल्ह्यांमध्येही दिसून येणार आहे. ज्यामुळे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आर्द्रता युक्त वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवस पाऊस पाहायला मिळू शकतो. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
सध्या पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड उकाडा जाणवत असून, गुरुवारी (ता.9) सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 37.8 अंश सेल्सिअस तापमान नोंद झाली आहे. तर पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, वाशीम येथेही पारा 35 अंशांच्यावर गेला आहे. याशिवाय अनेक भागांमधील किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यातून काही प्रमाणात थंडी गायब झाली आहे.