हॅलो कृषी ऑनलाईन : 2021- 22 हे वर्ष ‘उत्पादकता वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार असल्याचे कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जाहीर केले आहे. दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व व्हिडीओ कॉन्फरेन्स द्वारे बैठकीचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलं होतं त्यावेळी दादाजी भुसे बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले विकेल ते पिकेल या अभियाना अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत सर्व भाजीपाला एकत्र करून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. तसेच कृषी विभागामार्फत महामार्गावर शेतकऱ्यांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. किसान रॅलीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल थेट दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून कमीत कमी वेळेमध्ये शेतकऱ्यांचा शेतीमाल दिल्लीच्या बाजारपेठेमध्ये पोहोचेल असे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
बैठकीतील महत्वाचे मुद्दे
-रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पालेभाज्या तसेच औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
– शेतकरी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ तात्काळ व एका छत्राखाली मिळण्यासाठी गाव पातळीवर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली कृषी ग्राम विकास समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
– महाराष्ट्र आणि पालघर जिल्हा अन्नधान्यापासून स्वयंपूर्ण करण्यासाठी तसेच शेतकरी बांधवांचे शेती उत्पन्न वाढवण्यासाठी 2021- 22 हे वर्ष उत्पादकता वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
– सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
– फळ रोपवाटिकेमध्ये मजुरी काम करणाऱ्यांना वेळेत मजुरी मिळण्यासाठी अशा मजुरांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.