हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीमुळे बाजार समित्या बंद होत्या. मात्र आता दिवाळीनंतर पुन्हा बाजार समित्या सुरु झाल्याने शेतकऱ्यांना आशा आहे ती सोयाबीनच्या दराबाबतची… दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात तेजी होईल की घसरण याबाबत शेतकऱ्यांना कमालीची उत्सुकता लागली होती. मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. पाडव्यादिवशी सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली होती तेव्हा 5200 चा दर मिळाला होता. सोमवारी आवक कमी झाली मात्र दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. लातूर कृषी उत्पन्न बाजार सामितीत सोयाबीनचे दर 150 रुपयांनी घसरले.
सोयाबीनच्या दारात घसरण कायम
दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात सुधारणा होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, दिवाळीनंतरच्या पहिल्याच दिवशी बाजाप समितीमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण पाहायला मिळाली त्यामुळे भविष्यात काय होणार याची चिंता कायम आहे. हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनच्या वाढत्या दरामुळे आशादायी चित्र निर्माण झाले होते. पण वाढते दर हे काही दिवसांपूरतेच मर्यादित राहिले. गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेली घसरण कायम आहे.
उडिदाच्या दरात वाढ
हंगामाच्या सुरवातीपासून सोयाबीनच्या दरात घसरण तर उडदाचे भाव वाढत आहेत. त्यामुळे प्रतिकूल परस्थितीमध्ये उडदाचीच विक्री करुन शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली होती. दिवाळी निमित्त बाजार समित्या बंद होण्यापूर्वी उडदाला 7 हजाराचा दर होता तर आज सोमवारी उडदाला 7400 चा दर मिळाला आहे. आता पर्यंत उडदाच्या दरात घसरण तर झालीच नाही पण दर स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. सोयाबीनच्या दराने मात्र, शेतकऱ्यांची निराशाच केलेली आहे.
इतर शेतीमालाचे कसे आहेत दर
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. सोमवारी लाल तूर- 6200 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6150 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6000 रुपये क्विंटल, जानकी चना 4800 रुपये क्विंटल, विजय चणा 4950, चना मिल 4800, सोयाबीन 5300, चमकी मूग 7200, मिल मूग 6250 तर उडीदाचा दर 7400 एवढा राहिला होता.