हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राला पावसाने चांगलेच झोडपले आहे. यातच सांगली सातारा कोल्हापूर या भागात महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. आता हळूहळू या भागातलं पाणी ओसरू लागले आहे. सांगली जिल्ह्यात पुराचा फटका हा शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसला असून शेतकऱ्यांच्या 33 हजार हेक्टरहुन अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 202 गावातील 35 हजार 117 हून अधिक शेतकऱ्यांच्या 33 हजार हेक्टर हून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या महापुराच्या पाण्यात उस उभारलेला आहे. तर अन्न पीकं बुडालेली आहेत. कृषी विभागाच्या अंदाजानुसार हे क्षेत्र 23 हजार 539 हेक्टर इतकी आहे. त्यामध्ये सर्वाधिक ऊस तेरा हजार 722हेक्टर, भुईमूग 5316 हेक्टर, फळ पीक पावणेतीन हजार हेक्टरचा समावेश आहे. 2019 मधले 53 हजार हेक्टरचा नुकसान झालं होतं. पुरामुळे सर्वाधिक उसाचं 13 हजार 722 हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यानंतर भुईमूग 5316, विविध फळ पीक 2717 हेक्टर, सोयाबीन 558 हेक्टर, इतर 582 हेक्टर, द्राक्ष 70 हेक्टर, ज्वारी 28 हेक्टर, भाजीपाला 310 हेक्टर, कडधान्य 60 हेक्टर, फूल पिकांच्या 50 हेक्टरचा यात समावेश आहे.
जिल्हा 2019 मध्ये आलेल्या महापुरा पेक्षा यंदा शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात भाजीपाला पाण्याने कुजला आहे. त्यामुळे दररोज येणारा पैसा थांबला आहे. परिणामी आर्थिक फटका बसला आहे. आता प्रतीक्षा आहे ती नुकसानभरपाईची… वास्तविक पाहता 2019 ला शेतीचे पंचनामे झाले. भरपाई देखील मिळाली मात्र अनेक शेतकरी गतवर्षीच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे यंदाच्या पुराने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होतील पण नुकसान भरपाई तातडीने मिळावी, पूर बाधित शेतकऱ्यांना गतवर्षीप्रमाणे प्रतीक्षा करावी लागणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.