हॅलो कृषी ऑनलाईन : नंदुरबार जिल्ह्यात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मागील हंगामात कापसाला चांगला भाव मिळाला त्यामुळे यंदा देखील जिल्ह्यात कापसाची लागवड चांगली झाली आहे. मात्र कधी अतिवृष्टी तर कधी पिकांवर पडणारे रोग यामुळे इथला शेतकरी चिंतेत आहे. अशातच कापूस पिकाला मर रोगाने ग्रासले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे.
खरीप वाया जाण्याची भीती
नगदी पीक म्हणून कापसाची लागवड केली जाते. मात्र दरवर्षी विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होत असून बाजरात चांगला दर असतानाही शेतकऱ्याच्या हातात मात्र पैसे पडत नाहीत. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं कापसाची झाडे मोठ्या प्रमाणात मरत आहेत. अशात कापसाचे पीक कसे वाढवावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. मोठ्या प्रमाणावर महागडे असणारे बियाणे, तसेच मशागत आणि औषधे यांच्यावर शेतकऱ्यांचा खर्च झाला आहे. अशातच आता कापसाची उभी झाडे मोठ्या प्रमाणात मरत असल्यानं पिकासाठी केलेला खर्च शेतकऱ्यांच्या डोक्यावर बसणार आहेत. यातून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून, खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
नुकसानभरपाईची मागणी
दरम्यान ज्या भागात कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्या ठिकाणी पंचनामे करून शासनाने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी आष्टे परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.